... म्हणून परफेक्शनिस्ट आमिर म्हणतोय, मी चुकलो

 खुद्द आमिरनेच पुढे येत एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 

Updated: Nov 27, 2018, 10:26 AM IST
... म्हणून परफेक्शनिस्ट आमिर म्हणतोय, मी चुकलो title=

मुंबई : विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा बिग बजेट चित्रपट ज्या उत्साहाच्या भरात प्रेक्षकांच्या भेटीला आला तिच उत्सुकता चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये मात्र दिसू शकली नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे फारसे प्रभावी नसल्यामुळे आता खुद्द आमिरनेच पुढे येत एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 

समीक्षक आणि प्रेक्षकांची या चित्रपटाने निराशा केली होती. त्याचविषयी आपली प्रतिक्रिया देत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर म्हणाला, 'चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. आम्ही आमच्या परिने चित्रपटात पूर्ण योगदान देण्याता प्रयत्न केला. काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडलाही. पण, चित्रपट न आवडलेल्यांचा आकडा हा त्याहून जास्त आहे हे नाकारता येणार नाही.'

आपण निश्चितच चुकलो आहोत, असं म्हणत चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे आमिरने नाराजी व्यक्त केली आहे. आपण आपल्या परिने चित्रपटात पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही त्यात अपयशी ठरल्यामुळे आमिरने खंत व्यक्त केली.

एका पुरस्कार सोहळ्याच्या वेळी त्याने हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. चित्रपट हे आपल्या अपत्याप्रमाणेच आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेलं अपयशही माझंच आहे, असं म्हणत आमिरने अपयशाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन दिला. 

आमिरशिवाय या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्च, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. पण, तगडी स्टारकास्ट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची साहसदृश्य या चित्रपटाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकली नाहीत हेच खरं.