हिवाळ्यात 'ही' 9 फळं खाल्याने तुम्ही राहाल निरोगी

शरीरात होणाऱ्या बदलांसाठी ही फळ महत्वाची 

Updated: Nov 26, 2019, 10:23 AM IST
हिवाळ्यात 'ही' 9 फळं खाल्याने तुम्ही राहाल निरोगी  title=

मुंबई : राज्यभरात राजकीय वातावरण थोडं गरम असलं तरीही हिवाळा जाणवू लागला आहे. हिवाळ्याची चाहुली महाराष्ट्राला लागली असून 24 ते 25 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत आलं आहे. हिवाळ्यात वातावरणातील बदलाप्रमाणे शरीरात देखील काही बदल जाणवतात. अशावेळी पौष्टिक आहार हाच उत्तम पर्याय असतो. या दिवसांमध्ये सकस आहारासोबत फळांच सेवन करणं देखील तेवढंच गरजेचं असतं. 

हिवाळ्यामध्ये तहान फार लागत नाही अशावेळी पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. पर्यायाने शरीरातील पाण्याची पातळी खाली येते. अशावेळी फळांच सेवन केल्यास ही पातळी समतोल राहण्यास खूप मदत होते. प्रत्येक सिझनची फळ खावून आपण त्या त्या ऋतूमध्ये निरोगी राहू शकतो. म्हणून हिवाळ्या 'या' 9 फळांच सेवन अत्यंत महत्वाचं आहे. 

संत्र 
संत्र हे बाजारात आपल्याला दोन ऋतूमध्ये दिसतात. पण हिवाळ्यात येणारी संत्री ही खास करून गोड असतात. संत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा त्याचा समतोल राखण्यासाठी संत्र्याची खूप मदत होते. 

स्ट्रॉबेरी 
हिवाळ्यात हमखास मिळणारं आणि खाल्ल जाणारं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी फक्त दिसायलाच सुंदर असते असं नाही तर त्याचे फायदे देखील खूप आहे. स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते आणि तुमची त्वचा अधिक सुंदर म्हणजे तरूण दिसण्यासाठी याचा खूप फायदा होतो. तसेच यामध्ये देखील व्हिटामीन सी आणि व्हिटामीन बी सर्वाधिक असते. शरीरातील साखरेचं प्रमाण समतोल राखण्यासाठी स्ट्रॉबेरीचा फायदा होतो. अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण या फळात अधिक असून हृदयाच्या आरोग्यासाठी याचा खूप फायदा होतो. 

सिताफळ 
हिवाळ्यातील सिताफळ देखील अत्यंत महत्वाचं फळ आहे. अनेकांना यामध्ये खूप बिया असल्यामुळे खायला कंटाळा करतात. पण तुम्ही एकदा या फळाचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला अंदाज येईल की, या फळाचं किती महत्व आहे. सिताफळ हे लहान मुलांसाठी अत्यंत महत्वाच फळ आहे. वजन वाढण्याकरता हे फळ खाल्लं जातं. तसेच लहान मुलांची पचनशक्ती थोडी नाजूक असते अशावेळी सिताफळ खाल्याने पचनशक्ती व्यवस्थीत राहते. यामध्ये व्हिटामीन बी6 चे प्रमाण सर्वाधिक असते. लहान मुलांप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तींनी देखील हे फळ खावं.

 

अंजीर 
अनेकदा अंजीरचा वापर सुक्यामेव्यात केला जातो. मात्र हिवाळ्यात अंजीर हे फळ देखील अत्यंत गुणकारी आहे. सुक्यामेव्यातील अंजीर आपण वर्षभर खावू शकतो. पण ताजं अंजीर अत्यंत फायदेशीर आहे. अंजीर हे फळ पुरूषांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी अंजीर खाणं फायद्याचं ठरेल. अंजीरातील कॅल्शिअम हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी या फळाची खूप मदत होते. 

अननस 
ज्या व्यक्तींना संत्र आवडत नाही त्यांच्याकरता अननस हा उत्तम पर्याय आहे. अननस आणि संत्र्याचे फायदे जवळपास सारखेच आहेत. अननसातही व्हिटामीन सीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या फळात दाहकपदार्थाला विरोध करण्याची क्षमता सर्वाधिक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऍलर्जी झाल्यास त्याने अननसाचं सेवन करावं. हिवाळ्यात शरीराला आवश्यक बदल अननस हे फळ सांभाळून घेते. 

चिकू 
डोळ्यांची उत्तम निगा राखण्यासाठी आहारात व्हिटामीन ए अत्यंत महत्वाचे आहे. आणि चिकू या फळात व्हिटामीन ए चे प्रमाण सर्वाधिक आहे. तात्काळ भूक शमवण्याचे काम चिकू करू शकते. चिकूमधून भरपूर ऊर्जा मिळते यामुळे प्रवासात अगदी सहजपणे कॅरी करू शकतो. गरोदर महिलेकरता चिकू सर्वात फायदेशीर आहे. 

मोसंबी 
 हिवाळ्यात व्हिटामीन सीकरता आणखी एक पर्याय म्हणजे मोसंबी. संत्र्यापेक्षा अधिक प्रमाणात गोड मोसंबी असते. तसेच मोसंबीत सर्वाधिक फायबर असते जे शरीराला महत्वाचे असते. मोसंबीने श्वसनाचा त्रास कमी होतं. तसेच सूज कमी करण्यासाठी देखील गुणकरी आहे. संधीवाताचा त्रास असलेल्या व्यक्तीने मोसंबी जरूर खावी. 

स्टारफ्रूट 
कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी स्टारफ्रूट या फळाची खूप मदत होते. या फळामुळे शरीरात चरबीची पेशी तयार होण्यास प्रतिबंध निर्माण होते. या फळाची चव आंबट-गोड असल्यामुळे सलाडमध्ये याचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे त्याचा आकार लहान मुलांना अधिक आकर्षित करतो. 

पपई 
हिवाळ्यातील आदर्श फळ म्हणजे पपई. थंड वातावरणात तुमच्या शरीरातील उष्णता सांभाळून ठेवण्यासाठी पपईचा खूप फायदा होतो. थंडीशी दोन हात करण्यासाठी पपई जरूर खावा. तसेच महिलांची मासिक पाळी दर महिन्याला वेळेत आणि सुरळीत येण्यासाठी पपई महत्वाचा आहे. पपईमुळे त्वचा तजेलदार राहण्यास खूप मदत होते.