थंड की गरम? हिवाळ्यात कोणत्या पाण्याने आंघोळ करावी? काय सांगतात आयुर्वेदिक डॉक्टर

Winter Health Tips For Bathing: थंडीमध्ये आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की थंड याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणं अधिक फायद्याचं असतं असा एक सरसकट समज आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 22, 2023, 12:56 PM IST
थंड की गरम? हिवाळ्यात कोणत्या पाण्याने आंघोळ करावी? काय सांगतात आयुर्वेदिक डॉक्टर title=
अनेकांना दर हिवाळ्यात हा प्रश्न पडतो

Winter Health Tips For Bathing: हिवाळ्यामध्ये अनेकजण आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात. मात्र काही लोक हिवाळ्यातही थंड पाण्यानेच आंघोळ करतात. त्यामुळेच थंडीच्या दिवसामध्ये आंघोळीसाठी गरम पाणी जास्त फायद्याचं असतं की थंड असा प्रश्न अनेकांना पडतो. याचसंदर्भात डॉक्टरांचं काय म्हणणं आहे पाहूयात...

थंडीत प्रकृतीसंदर्भात अधिक सजग

उत्तर भारतामध्ये हळूहळू थंडी पडू लागली आहे. तापमानामध्ये घट होत असून पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये थंडी अधिक वाढणार असं सांगितलं जात आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंदर्भातील समस्यांपासून दूर राहण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टींबद्दल अधिक काळजी घेताना दिसतात. सर्दीमध्ये बरेच लोक गरम पाण्याने आंघोळ करण्याला प्राधान्य देतात. मात्र काहीजण थंडी असो किंवा उन्हाळा गरम पाण्यानेच आंघोळ करतात. 

डॉक्टरांचं म्हणणं काय?

थंडीमध्ये आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की थंड याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणं अधिक फायद्याचं असतं असा एक सरसकट समज आहे. यासंदर्भात आयुर्वेदिक डॉक्टर अभिनव राज यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आयुर्वेदामध्ये कोमट पाण्याने आंघोळ करणं फायद्याचं असतं असं सांगण्यात आल्याचं डॉक्टर म्हणाले. आंघोळीचं पाणी जास्त गरम नसावं. आंघोळीचं पाणी कोमट असल्यास ते थंडीत अधिक फायद्याचं ठरतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

..तर सर्दी-खोकला जाईल पळून

थंडीच्या दिवसांमध्ये कोमट पाण्याने आंघोळ केल्यास रक्ताभिसरण सुरळीत होतं. यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या व्हायरल संसर्गाचा त्रास कमी होतो. तसेच शरीर अवघडल्यासारखं होत नाही. कोमट पाण्याने अंग अधिक छान पद्धतीने स्वच्छ करता येतं. तसेच कोमट पाणी वापरल्यास सर्दी होण्याची शक्यताही फार कमी असते. ज्या लोकांना त्वचेसंदर्भातील समस्या आहेत अशा लोकांनी गरम पाणी आंघोळीसाठी वापरु नये, असंही डॉक्टर सांगतात.

कोणी करावी थंड पाण्याने आंघोळ?

थंड पाण्याने आंघोळ करण्यासंदर्भात डॉ. राज यांनी कोणत्याही ऋतूमध्ये ताज्या पाण्याने आंघोळ करणं फायद्याचं असतं. रात्री भरुन ठेवलेलं पाणी हे अधिक थंड असतं. अशा पाण्यामुळे सर्दी-खोकला होण्याची शक्यता अशते. ताज्या पाण्याने आंघोळ करणं आरोग्यासाठी नुकसानदायक नसतं असं आयुर्वेदात म्हटलं आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते असे लोक थंड पाण्याने आंघोळ करु शकतात, असं डॉक्टर सांगतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

ज्यांना हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास होतो किंवा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांनी ताज्या पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी. असं केल्यास या लोकांना होणारा सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो. तुम्ही तुमच्या डॉक्टरांनाही यासंदर्भात विचारुन सल्ला घेऊ शकता.