सीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं

Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. पण आता एक भारतीय तरुणी फेसबुक (Facebook) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 24, 2023, 01:40 PM IST
सीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं title=

Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. सीमा हैदरने बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली असल्याने एटीएस तिची चौकशी करत आहे. त्यातच आता एक भारतीय तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली आहे. अंजू असं या तरुणीचं नाव असून वाघा बॉर्डर ओलांडून ती पाकिस्तानात दाखल झाली आहे. सध्या या लव्ह स्टोरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कैलोर येथील निवासी असणारी अंजू आपला फेसबुक मित्र आणि प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे. नसरुल्लाह खैबर पख्तूनख्वा येथे वास्तव्यास असून एक वैद्यकीय प्रतिनीधी असल्याची माहिती आहे. 

90 दिवसांचा व्हिसा

पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या व्हिसाची माहिती समोर आली आहे. अंजूच्या पाकिस्तान प्रवासासाठी 4 मे रोजी पाकिस्तानकडून व्हिसा जारी करण्यात आला होता. हा व्हिसा 90 दिवसांसाठी वैध आहे. यानंतर अंजूने वाघा बॉर्डर ओलांडत पाकिस्तानात प्रवेश केला आहे. आपलं नसरुल्लाहवर प्रेम असून, आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही असं अंजूचं म्हणणं आहे. 

अंजूची पाकिस्तानात चौकशी

दरम्यान, ज्याप्रमाणे सीमाची सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानात पोहोचल्यानंतर अंजूचीही चौकशी होत आहे. सीमा आणि अंजू यांच्या लव्हस्टोरीत एक गोष्ट सारखीच आहे. ती म्हणजे दोघींनीही प्रेमाखातर सीमा ओलांडली आहे. फक्त दोघींनी ज्याप्रकारे प्रवास केला आहे, तो मुख्य फरक आहे. 

सीमा हैदरचा भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश

भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरची लव्ह स्टोरी संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. पबजी खेळताना सीमा आणि सचिन यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. यानंतर सीमाने आपल्या चार मुलांसह देश सोडला आणि नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला. सीमा आणि सचिनने सुरुवातीला सर्व माहिती लपवली होती. पण नंतर जेव्हा ही बाब उघड झाली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

सीमा हैदर आणि सचिन यांची सध्या युपी एटीएसकडून चौकशी केली जात आहे. यावेळी सीमावर प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सीमा आपण पाकिस्तानात परत जाणार नाही असं सांगत आहे. आपण भारताची मुलगी आणि सून असून पाकिस्तानात गेला तर मृतदेह जाईल असं म्हटलं आहे. आपण एजंट नसल्याचा तिचा दावा आहे.