निष्काळजीपणाचा कहर! रेल्वे अपघातातील जखमी तरुणाला लावला रिकामा ऑक्सिजन सिलेंडर, शेवटी...

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन सिलेंडर जखमी व्यक्तीला लावला. पण अपघातात जखमी झालेल्या तरुणाची तब्येत आणखीनच बिघडली. ऑन ड्युटी डॉक्टरांनी रुग्णालयातील सीनिअर डॉक्टरांना बोलावलं. पण सीनिअर डॉक्टर येण्याआधीच तरुणाची मृत्यूशी झुंज संपली होती. 

राजीव कासले | Updated: Sep 26, 2023, 05:56 PM IST
निष्काळजीपणाचा कहर! रेल्वे अपघातातील जखमी तरुणाला लावला रिकामा ऑक्सिजन सिलेंडर, शेवटी...  title=

MP News : रेल्वे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयातील (Hospital) निष्काळजीपणामुळे दुर्देवी मृत्यू झाला. रेल्वे अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला, त्याला तात्काळ जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले, पण तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सर्जिकल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. तरुणाची ऑक्सिजन लेव्हलही (Oxygen) कमी झाली होती. त्यामुळे त्याला तात्काळ ऑक्सिजन सिलेंडर (Oxygen Cylinder) लावण्यात आला. पण धक्कादायक म्हणजे तो ऑक्सिजन सिलेंडर चक्क रिकामा होता. इतकंच नाही तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पल्स ऑक्सिमीटर आणि इंजेक्शनही सापडलं नाही. तरुणाची तब्येत आणखी बिघडल्याने ऑन ड्युटी डॉक्टरांनी सिनिअर डॉक्टर्सना बोलावलं. पण सीनिअर डॉक्टर एक तासांनंतर रुग्णालयात पोहोचले. तोपर्यंत जखमी तरुणाचा तडपून मृत्यू झाला. 

मध्य प्रदेशमधल्या शाजापूर जिल्ह्यात ही घटना घडली.  राधेश्याम गुप्ता नावाचा तरुण उज्जैनमध्ये महाकाल दर्शन करुन रेल्वने छतरपूर इथल्या आपल्या घरी परतत होता. राधेश्यामने उज्जैनवरुन सकाळी 11 वाजता भोपाळला जाणारी रेल्वे पकडली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ट्रेन बेरछा रेल्वे स्टेशनवर आली. प्लॅटफॉर्मव ट्रेन थांबली असताना राधेश्याम बाटलीत पिण्याचं पाणी भरण्यासाठी खाली उतरला.. इतक्यात ट्रेन सुरु झाली. धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना राधेश्यामचा पाय घसरला आणि तो ट्रॅकवर कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला. आसपासच्या लोकांनी राधेश्यामला बेरछा इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. 

रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांनी त्याला मलमपट्टी केली. पण राधेश्यामची प्रकृती आणखी बिघडली. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची प्रकृती पाहाता डॉक्टरांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन सिलेंडर लावण्यात सांगतिलं. पण कर्मचाऱ्यांनी राधेश्यामला रिकामा ऑक्सिजन सिलेंडर लावला. इतकंच काय डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांकडे इंजेक्शन मागितलं, तेव्हा कर्मचारी शोधाशोध करु लागले. पण यानंतरही त्यांना इंजेक्शन मिळालं नाही. 

राधेश्यामचे पल्स तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरची मागणी डॉक्टांनी केली. पण कर्मचाऱ्यांना तेही मिळालं नाही. अखेर सीनिअर डॉक्टर नवीन झाला यांना बोलावण्याचा निर्णय घेण्या आला. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना फोन लावला आणि बोलावून घेतलं. पण सीनिअर डॉक्टर नवीन झाला हे तब्बल एकतास उशीरा आले. पण त्याधीच राधेश्यामचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे राधेश्यामला जीव गमवावा लागला. 

अनेक प्रश्न उपस्थित
राधेश्यामच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राधेश्यामची प्रकृती गंभीर असातनाही त्याला इमरजेंसी वॉर्डमध्ये का दाखल करण्यात आलं नाही? रुग्णाला रिकामा ऑक्सिजन लावण्यामागे दोषी कोण? रुग्णालयात एकच डॉक्टर का उपस्थित होता? उपचारादरम्यान वैद्यकिय उपकरणं का शोधावी लागली? असे अनेक प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केले आहेत.