'सिद्धू यांना मंत्री बनवण्याची पाकिस्तानमधून शिफारस' अमरिंदर सिंग यांचा मोठा दावा

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या (Punjab Assembly Election) तोंडावर राजकीय खळबळ माजली आहे.

Updated: Jan 24, 2022, 09:24 PM IST
'सिद्धू यांना मंत्री बनवण्याची पाकिस्तानमधून शिफारस' अमरिंदर सिंग यांचा मोठा दावा title=

Punjab Election 2022 : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना मंत्री बनवण्याचा संदेश पाकिस्तानकडून आला होता, असं अमरिंदर सिंग म्हटलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या या दाव्याने पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या (Punjab Assembly Election) तोंडावर राजकीय खळबळ उडाली आहे.

सिद्धू-कॅप्टनमध्ये टोकाचा वाद 
सिद्धू हे सध्या पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला पोहचल्याने अमरिंदर सिंग यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर काँग्रेसने दलित चेहरा पुढे करत चरणजित सिंह चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची कमान सोपवली.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. आगामी पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेस (Punjab Lok Congress) आणि शिरोमणी अकाली दल (युनायटेड) यांच्याशी युती केली आहे.

'पाककडून मंत्री बनवण्याचा संदेश'
अमरिंदर आणि धिंडसा यांच्या उपस्थितीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले, '...पाकिस्तानकडून संदेश आला की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी (Pakistan PM) विनंती केली आहे, तुम्ही सिद्धूला तुमच्या मंत्रिमंडळात घेऊ शकत असाल तर मी तुमचा आभारी आहे. तो माझा जुना मित्र आहे आणि जर ते काम करत नसेल तर काढून टाका' असा धक्कादायक गौप्यस्फोट अमरिंदर सिंग यांनी केला आहे.

2017 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण सिद्धू यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं, पण त्यांनी कोणतंही काम केले नाही, त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले, असा आरोपही अमरिंदर सिंग यांनी केला.

सिद्धू अकार्यक्षम असल्याचं सिद्ध
अमरिंदर म्हणाले, 'मी सिद्धूला पदावरून काढून टाकलं कारण ते अकार्यक्षम आणि निरुपयोगी होते. त्यांनी ७० दिवसांत एकही फाइल पूर्ण केली नव्हती. ते म्हणाले की, यानंतर सिद्धू यांना मंत्री बनवण्याचा संदेश पाकिस्तानमधून आला होता, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.