Ram Mandir : भूमिपूजनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया

भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी .... 

Updated: Aug 5, 2020, 01:49 PM IST
Ram Mandir : भूमिपूजनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया  title=
छाया सौजन्य- एएनआय

अयोध्या : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, न्यायालयीन संघर्षानंतर अखेर ayodhya अयोध्येत ram mandir रामजन्मभूमीचा वाद सुटला आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस उजाडला. या दिवसासाठी प्रभू श्रीरामाच्या अयोघ्या नगरीनं जणू कात टाकली. राम मंदिर उभारणीच्या दृष्टीनं उचलण्यात आलेलं हे पाऊल आणि शिलान्यासाचा विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. पंतप्रधनानंसह या सोहळ्याला सरसंघचालक Mohan Bhagwat मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह इतर १७५ आमंत्रितांची उपस्थिती होती. 

अतिशय नेत्रदीपक अशा या सोहळ्याच्या प्रसंगी भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर व्यासपीठावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला आनंद व्यक्त केला. जवळपास ३० वर्षांचा हा संकल्प पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जवळपास गेली २०-३० वर्षे काम केल्यानंतर अखेर तिसाव्या वर्षाच्या सुरुवातीला आम्हाला संकल्पपूर्तीचा आनंद मिळत आहे. वर्षानुवर्षांची इच्छा पूर्ण झाल्याची आनंदाची लाट साऱ्या देशातच पाहायला मिळत आहे, असं भागवत म्हणाले. 

तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अनेक वर्षे काम केल्यानंतर हे राम मंदिर उभारणीचं हे काम पूर्ण होईल असं म्हटलं होतं. यासाठी अनेकांनीच बलिदान दिलं आहे. ते सूक्ष्म रुपात आपल्या सोबत आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

मागील कैक वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही. देशात आज प्रत्येकाच्या मनात आनंदाचा क्षण आहे, प्रत्येकात प्रभू श्रीराम आहेत. मुळात राम मंदिराच्या उभारणीचं काम सर्वांना वाटून देण्यात आलं आहे. परंतु आपल्याला आपल्या मात्र मनातही अयोध्या वसवायची आहे. इथं अयोध्येत जसं मंदिर उभं राहिल तसंच आपल्या मनातही अयोध्या उभी राहायला हवी. हे मंदिर उभं राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभं राहायला पाहिजे, असं भागवत मोठ्या विश्वासानं म्हणाले. 

भारताला आत्मनिर्भर, स्वावलंबी करण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आवश्यकता होती त्याचं सगुणसाकार अधिष्टान आज साराकलं जात आहे, असं म्हणत त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त केला.