केरळ: पूरग्रस्तांना एसबीआयचा हात, दिल्या या ५ सुविधा

प्राप्त माहितीनुसार, आठ ऑगस्टपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३२४ लोकांचे बळी गेले आहेत.

Updated: Aug 18, 2018, 11:49 AM IST
केरळ: पूरग्रस्तांना एसबीआयचा हात, दिल्या या ५ सुविधा title=

नवी दिल्ली: केरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. पंतप्रधानांपासून ते थेट मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनापर्यंत असे सर्वजण या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना मदत करत आहेत. अशात स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआयनेही या पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. एसबीआयने पूरग्रस्तांना मदत म्हणून तब्बल दोन कोटी रूपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, एसबीआयने पूरग्रस्तांसाठी इतरही अनेक सुविधा देऊ केल्या आहेत.

आतापर्यंत ३२४ लोकांचे बळी 

प्राप्त माहितीनुसार, आठ ऑगस्टपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३२४ लोकांचे बळी गेले आहेत. राज्यातली लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. प्रचंड प्रमानात वित्तहानीही झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ८ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

एसबीआयने देऊ केलेल्या सुविधा

  • मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत पाठवल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर शुल्क आकारण्यात आले तर, ते माफ केले जाईल.
  • ग्राहकांच्या खात्यात मुलभूत रक्कम ठेवण्याची अटही काढण्यात आली. त्या खातेधारकांना लागलेला दंडही माफ केला जाणार.
  • ग्राहकांच्या क्रेडीट कार्ड्सची सेवा एक महिन्यांनी वाढवली.
  • राज्यात जागोजागी पॉईंट ऑफ सेल (PoS) बनविण्यात आले आहेत. ज्यामुळे कमीत कमी २००० रूपये ग्राहकाला खात्यावरून काढता येऊ शकतात.
  • ज्या ग्राहकांची व्यक्तीगत कागदपत्रे गहाळ, किंवा हरवली आहेत त्यांचे फोटो आणि स्वाक्षरी किंवा आंगठ्याची निशाणी घेऊन खाते उघडले जाईल.