SSC Result 2021 : दहावीचा निकाल या महिन्यात लागणार, वेळेत होणार अकरावीचे प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jun 4, 2021, 05:13 PM IST
SSC Result 2021 : दहावीचा निकाल या महिन्यात लागणार, वेळेत होणार अकरावीचे प्रवेश title=

दीपक भातुसे, मुंबई : दहावीची परीक्षा (10th Exam) रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावणं आणि अकरावीचे प्रवेश करण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. दहावीचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचा शिक्षण विभागाने ठरवलं आहे. या दिशेने शिक्षण विभागाने कामाला सुरुवात केली आहे. (10th Result announced in July 2021)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. यंदा दहावीला १६ लाख विद्यार्थी बसले होते. हे विद्यार्थी परीक्षा न देता पुढच्या वर्गात जाणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी दहावीची अंतिम परीक्षा परीक्षा दिली नसली तरी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दहावीचे निकालपत्र द्यायचे आहे. 

नववी आणि दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जाणार असून त्या आधारे दहावीचा निकाल तयार केला जाणार आहे. (SSC RESULT 2021)

- नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल तयार केला जाणार आहे
- दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या  वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण 
- गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जाणार आहेत

अशा पद्धतीने दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असणार आहे.

दहावीच्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढे अकरावीसाठी प्रवेश (FYJC Maharashtra Online Admission 2021) घेता येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना आपण यापेक्षा चांगले गुण मिळवून चांगल्या महाविद्यालयात प्रेवश मिळवू शकतो, असं वाटत असेल त्यांच्यासाठी सीईटीचा पर्याय शिक्षण विभागाने ठेवला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्यात येणार आहे. मात्र ही सीईटी बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. 

दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही सीईटी असणार आहे. सीईटीचे स्वरुप बहुपर्यायी असेल. १०० गुणांची ही सीईटी दोन तांसांची असेल. अकरावीच्या प्रवेशात एकवाक्यता रहावी आणि सर्वांना समान संधी मिळावी यासाठी ही सीईटी घेतली जाणार आहे. एकूणच दहावीची परीक्षा होणार नसली तरी पुढील निकाल आणि अकरावीच्या प्रवेशाचे सोपस्कार सुरळीत पार पाडण्याचा आव्हान शिक्षण विभागासमोर असणार आहे.