हॉटेल-बारच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी सक्तीची, KDMC चा नवा आदेश

कल्याण-डोंबिवलीमध्ये ५०च्या खाली आलेली कोरोना रुग्णसंख्या आता वेगाने वाढू लागली आहे. दररोज ६००च्या घरात नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळेच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निर्बंध कडक करायला सुरूवात केली आहे. 

Updated: Mar 23, 2021, 06:29 PM IST
हॉटेल-बारच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी सक्तीची, KDMC चा नवा आदेश  title=
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : कल्याण-डोंबिवलीमध्ये ५०च्या खाली आलेली कोरोना रुग्णसंख्या आता वेगाने वाढू लागली आहे. दररोज ६००च्या घरात नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळेच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निर्बंध कडक करायला सुरूवात केली आहे. 

कल्याण-डोंबिवलीतील आता हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिकेनेच तसे आदेश दिले आहेत. निर्बंधांमध्ये शिथिलता मिळू लागल्याने कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांवर तसंच हॉटेल-रेस्टॉरंटमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळेच अशा ठिकाणाहून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच आता बार, हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणं सक्तीची करण्यात आले आहे. 

पुढील ७ दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांना स्वत: खर्च करूनच कोरोना चाचणी करायची आहे. तसेच त्याचा अहवाल moh.kdmc@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवायचा आहे. केडीएमसीच्या सर्व प्रभाग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारमध्ये भेट देऊन याबाबत खातरजमा करण्यासही सांगण्यात आले आहे. जे या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशाराही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. 

कल्याण-डोंबिवलीमध्ये मार्चच्या सुरूवातीपर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात होती, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव कल्याण-डोंबिवलीत पसरू लागला आहे. आजही केडीएमसीत ७११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दररोज नव्या रुग्णांचा रेकॉर्ड मोडतच चालल्याने केडीएमसीने निर्बंध लावायला सुरूवात केली आहे. संध्याकाळी ७ नंतर दुकानेही बंद करण्यात येत आहेत. रुग्ण अधिक मिळत असलेल्या इमारती सील करण्यात येत आहेत. आणि आता बार, हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणं सक्तीचं करण्यात आले आहे.