Tauktae चक्रीवादळाने कोकणात इतक्या कोटींचे नुकसान, कोकण विभागीय आयुक्तांचा सरकारला अहवाल सादर

Cyclone Tauktae : चक्रीवादळाने कोकण (Konkan) किनारपट्टीजवळील गावांना जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे कोसळलीत. 

Updated: May 24, 2021, 02:44 PM IST
Tauktae चक्रीवादळाने कोकणात इतक्या कोटींचे नुकसान, कोकण विभागीय आयुक्तांचा सरकारला अहवाल सादर title=

 मुंबई : Cyclone Tauktae : चक्रीवादळाने कोकण (Konkan) किनारपट्टीजवळील गावांना जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे कोसळलीत. तर आंबा, नारळ बागायतीचे मोठे नुकसान झाले. शेतीबरोबरच जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले. तर अनेक गावातील विद्युत खांबही कोसळल्याने काही दिवस अंधारात राहाे लागले होते. Tauktae चक्रीवादळाचा तडाखा सर्वात जास्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला बसला. त्यामुळे  कोकण विभागीय आयुक्त ( Konkan Divisional Commissioner ) यांनी कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीसाठी 47 कोटी 15 लाख रुपयांचीची मागणी मदत व पुनर्विकास विभागासाठी केली आहे. (Cyclone Tauktae causes loss of Rs 47.15 crore in Konkan) 

कोकण विभागीय आयुक्तांनी Tauktae चक्रीवादळानंतर केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यानंतर ही मागणी केली आहे. एकूण मागणी  47 कोटी 15 लाख रुपयांचा पंचनामा अहवाल राज्य सरकारकडे (Maharashtra Government) सादर करण्यात आला आहे. यामध्ये मनुष्यहानीसाठी 41.20  लाख रुपये, पशूधन नुकसान 6.20 लाख, घरगुती वस्तू व कपडे -  11.29  लाख रुपये, घरांची पडझड 25 कोटी 24 लाख, जनावर गोठ्या - 34.84  लाख,  मत्स्य व्यावसायिक-  4 कोटी 49 लाख आणि  शेतीचे 16 कोटी 48 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणासाठी वादळग्रस्तांच्या मदतीसाठी 47 कोटी 15 लाख रुपयांची मागणी मदत व पुनर्विकास विभागासाठी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोकणातील नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडूनही पाहणी करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही काही ठिकाणची पाहणी केली. तसेच महाविकास सरकारधील मंत्री यांनीही पाहणी दौरे केलेत. तसेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीही पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर कोणतीही मोठी घोषणा न करता मदत योग्य प्रकारे मिळेल, अशी  ग्वाही दिली आहे. 

दुसरीकडे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल मालवण, देवबाग, किल्ले निवती, मेढा, वेंगुर्ला, पंढरीनाथवाडी आदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.  संपूर्ण नुकसानीचा  पंचनामा झाल्यानंतर नुकसानग्रस्तांना मदत करताना शासन हात आखडता घेणार नाही. सढळ हाताने भरीव मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी पाहणी दौऱ्यात दिली.  चक्रीवादळामुळे नुकसान मोठे झाले आहे. पंचनाम्यांचे आदेश दिले असून घरांचे पंचनामे जवळपास संपत आले आहे. शेतीचे आणि फळबागांचे पंचनामेही सुरु आहेत. ते ही लवकरच पूर्ण होतील. कोकणवासियांना भरीव मदत केली जाईल. कोणालाही  नाराज न करता सढळ हाताने कशी मदत केली जाईल ही भूमिका शासनाची आहे. संरक्षण बंधारे बांधण्यासाठी तातडीने मंत्रालयात बैठक बोलावली जाईल त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही ते म्हणाले.

4 लाख मदतीच्या धनादेशाचे वितरण

Tauktae चक्रीवादळावेळी देवगड येथे झालेल्या नौका दुर्घटनेतील मृत  दिनेश गजानन जोशी आणि राजाराम कृष्णा कदम यांच्या वारसाना प्रत्येकी 4 लाखाचा धनादेश मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.