महिला अत्याचाराविरोधात अधिवेशनात योग्य निर्णय घेणार - उपमुख्यमंत्री

वारंवार होणाऱ्या महिला हल्ल्यांबाबत विचार करून याबाबत कडक कायदा करण्याचा विचार

Updated: Feb 16, 2020, 04:54 PM IST
महिला अत्याचाराविरोधात अधिवेशनात योग्य निर्णय घेणार - उपमुख्यमंत्री  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : महिलांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना पाहता अधिवेशनात याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. विचार करून याबाबत कडक कायदा करण्याचा आम्ही विचार करतोय मात्र याबाबत सर्वच पक्षांनी कसल्याही पद्धतीचे राजकारण आणता कामा नये असेही ते म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांची पाचव्या पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आर.आर पाटील यांच्या अंजनी येथील समाधीस्थळाचं दर्शन घेऊन आबांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अजित पवार बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत त्यांच्या मनात आहे, तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका असणार नाही. यामुळे इतर कोणाच्या वक्तव्याला फार महत्त्व देणे गरजेचे नसल्याचे पवार यांनी केले आहे.

इंदुरकर महाराजांच्या वक्तव्याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी टाळले. याबाबत अद्याप पूर्ण माहिती मला नाही, त्यामुळे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय प्रतिक्रिया घेणे हे उचित ठरणार नसल्याचे ते म्हणाले. मात्र सार्वजनिक जीवनात काम करत असताना सर्वच लोकांनी जबाबदारीनं वक्तव्य करणे गरजेचे आहे. कारण कायदा हा सर्व व्यक्तीसाठी समान असतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्र्यांनी केले.

भाजपा नेते सुधीर मुंगूनटीवार हे मंत्री असताना म्हणाले होते, की, आबा हयात नाहीत म्हणून, आमचे सरकार आले आहे. मात्र मी मुनगंटीवार यांना सांगतो, आज आबा जरी नसले तरी, आमच्यासोबत आबांची पुण्याई आणि जिवाभावाची माणस आहेत. त्यामुळे तुम्हाला आज घरी बसावं लागलं.  ताम्रपट घेऊन कोणच जन्माला येतं नसतं. याचं भान मुनगंटीवार यांनी समजून घ्यावं. जोपर्यंत बहुमत आमच्यासोबत आहे. तोपर्यंत आमच्या सरकारला धोका नाही. हे भाजप नेत्यांनी चांगल्या प्रकारे समजून घ्यावे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.