नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातानंतर 21 गाड्यांचे मार्ग बदलले; पुण्याच्या 'या' एक्स्प्रेसचाही समावेश

North East Express Accident: भारतीय रेल्वेमधील अपघातांचं सत्र नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा रेल्वे विभागाला हादरवणारी एक भयानक घटना नुकतीच बिहारमधील (Bihar) बक्सर (Buxar) येथे घडली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 12, 2023, 01:27 PM IST
नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातानंतर 21 गाड्यांचे मार्ग बदलले; पुण्याच्या 'या' एक्स्प्रेसचाही समावेश title=
Indian Railways Cancels 8 Trains Diverts 21 After North East Express Derails

North East Express Accident: बिहारमधील बक्सर येथे रेल्वे प्रशासनाला हादरवणारी घटना घडली आहे. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर जंक्शन येथे नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस ट्रेन (North East Express Train) चे 21 डबे रुळांवरुन घसरले आहेत. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 100 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातानंतर अनेर ट्रेन आणि एक्स्प्रेसना फटका बसला आहे. अनेक एक्स्प्रेस उशीरांनी धावत आहेत तर काही रद्द करण्यात आल्या आहे. तर, काही एक्स्प्रेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील एक्स्प्रेसलाही याचा फटका बसला आहे. 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पटना काशी जनशताब्दी एक्स्प्रेस (15126) आणि काशी पटना जन शताब्दी एक्स्प्रेस (15125) .या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. 

'या' एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात आले

 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या अपघातानंतर या मार्गावरुन जाणाऱ्या 21 एक्स्प्रेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही एक्स्प्रेसना पर्यायी मार्गावरुन चालवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुणे-दानापूर एसएफ एक्सप्रेस (१२१४९), पाटलीपुत्र एसएफ एक्सप्रेस (१२१४१), दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस (१२४२४), विक्रमशिला एक्सप्रेस (१२३६८), कामाख्या एक्सप्रेस (१५६२३), गुवाहाटी एक्सप्रेस (१५६३३), राजेंद्र नगर टर्मिनल राजधानी एक्सप्रेस (तेजस), भागलपूर गरीब रथ एक्सप्रेस (22406), Anvt Rdp एक्सप्रेस (22488), या गाड्यांचा समावेश आहे. 

कसा घडला अपघात?

दिल्लीहून कामाख्याला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. ट्रेनचे 21 डबे रुळांवरुन घसरले आहेत. डीडीयू पाटणा रेल्वे विभागाच्या रघुनाथपूर स्थानकात ही घटना घडली आहे. दिल्लीहून पाटण्याच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली आहे. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये. या अपघाताच्या मूळ कारणांचा शोध घेतला जात आहे. रेल्वे अपघाताची माहिती मिळताच बिहारचे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं. घटनास्थळी SDRF चं पथक सध्या बचावकार्यात मदत करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. 

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे बक्सरहून निघाल्यानंतर ही रेल्वे गतीने पुढे जात होती. त्याचदरम्यान रघुनाथपूर रेल्वे स्थानकानजीक पास पॉइंट बदलत असतानाच एक मोठा झटका लागला आणि रेल्वेचा अपघात झाला, असं सांगण्यात येतंय.