'ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर...'; भाजपाबरोबरच्या युतीवरुन शिंदे गटाला राऊतांचा टोला

Loksabha Election 2024 Shinde Group Vs BJP Uddhav Thackeray Gorup Reacts: लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 7, 2024, 12:38 PM IST
'ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर...'; भाजपाबरोबरच्या युतीवरुन शिंदे गटाला राऊतांचा टोला title=
राऊतांनी लगावला टोला

Loksabha Election 2024 Shinde Group Vs BJP Uddhav Thackeray Gorup Reacts: लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीमधील एकनाथ शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरु असतानाच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपाला 'केसाने गळा कापू नका' असा इशारा भाजपाला दिला आहे. रामदास कदमांच्या या इशाऱ्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सत्ताधारी घटकपक्षांमधील या शाब्दिक बाचाबाचीवर आता उद्धव ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

कदम नेमकं काय म्हणाले?

भाजपाचे राज्यातील आघाडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून आपल्या मुलाला मुद्दाम जाणीवपूर्वकपणे त्रास दिला जातोय असा आरोप रामदास कदमांनी केला आहे. चव्हाणांच्या विषयावरुनच बोलताना रामदास कदमांनी भाजपा नेत्यांना थेट, 'भाजपाने केसाने गळा कापू नये,' असा इशारा दिला आहे. 'माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा,' असं सूचक विधान करत त्यांनी भाजपा नेत्यांना वरिष्ठांनी समज द्यावी असं म्हटलं आहे. "महाराष्ट्रातील भाजपा जे काही करत आहे ते फारच घृणास्पद आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, अशी  माझी प्रामाणिक इच्छा आहे," असं रामदास कदम म्हणालेत. पुढे बोलताना कदम यांनी, "प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. मात्र जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केलं तर भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांना असायला हवं. आपल्यातील संबंधांबाबत जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचं भान भाजपाच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे," असं रामदास कदम म्हणाले.

"आमची (संयुक्त शिवसेना) आणि भाजपाची 2009 मध्ये युती होती तरीही भाजपाने मला गुहागरच्या विधानसभा निवडणुकीत पाडलं हे वास्तव आहे," अशी आठवणही रामदास कदमांनी करुन दिली. "आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. स्थानिक आमदार असलेल्या योगेश कदम यांना बाजूला ठेवून त्यांच्याच मतदारसंघात विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं केली जात आहेत. स्थानिक आमदाराला त्रास देण्याचं काम हेतूपुरस्पर चाललं आहे. असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. या प्रकरणाची दखल भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर घेतली गेली पाहिजे, माझं प्रामाणिक मत आहे," असं रामदास कदम म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> '1001% सांगतो मोदी-ठाकरे एकत्र येतील, कारण...'; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

राऊतांचा कदमांच्या विधानावरुन टोला

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी रामदास कदमांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "या गटाविषयी आम्हाला काही बोलायचं नाही. केसांना गळा कापू नका हे कोणाला सांगत आहेत ते आम्हाला माहित नाही पण त्यांची केस आमच्याकडून संपलेली आहे," असा टोला राऊतांनी लगावला आहे. "उद्याच्या निवडणुकीत त्यांच्या केसची फाईल जनता बंद करणार आहे. ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर काही बोलू शकत नाही त्यांचं त्यांनी पहावं," असंही राऊत म्हणाले.

यांच्या भांडणामुळेच होणार पराभव

रामदास कदमांनी नोंदवलेल्या या मतावर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. "2024 च्या निवडणुकीत जनता त्यांना घरी बसवेल. त्यांचे हे भांडण त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे," असं राजन साळवींनी म्हटलं आहे. "रामदास कदम यांना शिवसेनेने मोठे केले, ते आमदार झाले. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होईल," असा विश्वास साळवींनी व्यक्त केला.