शिंदे सरकारमध्ये सहभागी का झालो? अजित पवारांनी सांगितली 10 कारणे

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 2, 2023, 05:10 PM IST
शिंदे सरकारमध्ये सहभागी का झालो? अजित पवारांनी सांगितली 10 कारणे title=

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर इतर नऊ मंत्र्यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. दरबार हॉलमध्ये हा शपथविधीचा सोहळा पार पडला. या शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 10 मुद्द्यांमध्ये जाऊन घेऊया अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील - अजित पवार

आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होण्याचा निर्णय घेतला. मी आणि इतर सहकाऱ्यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी शपथ दिली, असे अजित पवार म्हणाले

सहकाऱ्यांनाही संधी मिळणार - अजित पवार 

मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. मंत्रिमंडळात पुढे पुन्हा विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदी देशाला पुढे नेण्याचं काम करत आहे - अजित पवार

"अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सध्या देशात आणि राज्यातील परिस्थितीचा विचार करून विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि सहकाऱ्यांचं मत झालं. मोदींच्या नेतृत्वाखाली जो कारभार चालला आहे. ते बघितलं तर मोदी मजबुतीने देशाला पुढे नेण्याचं काम करत आहे," असे अजित पवार म्हणाले.

विरोधी पक्षांच्या बैठकीतून काहीच बाहेर येत नाही - अजित पवार

विरोधी पक्षाची बैठक होते त्यातून व्यवस्थित काही बाहेर येत नाही. आज देशात खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे अजित पवार म्हणाले. 

शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला - अजित पवार

राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार काम करत होते. मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. वर्धापन दिनाच्या दिवशीसुद्धा मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती, असेही अजित पवार म्हणाले.

तरुणांना संधी देणे गरजेचं आहे - अजित पवार

शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच राष्ट्रवादी पक्ष इथपर्यंत पोहोचला आहे. इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देणे गरजेचं आहे. मी मागच्यावेळी सरकारमध्ये असताना विकासकामे हा एकच विचार करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राला केंद्राचा निधी मिळावा म्हणून हा निर्णय घेतला - अजित पवार

केंद्रीय निधी महाराष्ट्राला मिळेल हे पाहणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेतला. हा निर्णय जवळपास बहुतेक आमदारांना मान्य आहे, असेही अजित पवार म्हणाले.

टीकेला उत्तर देणार नाही - अजित पवार

काहीजण आता टीका करतील. पण आम्हाला टीकेला उत्तर देण्याचं कारण नाही महाराष्ट्राचा विकास करणं, निधी कसा मिळेल, सर्व घटकांना मदत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व आमदारांना मान्य आहे, असे अजित पवार म्हणाले.

निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हाखालीच लढवणार - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या सरकारमध्ये सहभागी झालो असून, इथून पुढच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हाखालीच लढवणार आहोत. पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.

आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो - अजित पवार

"आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये काम केलं. त्यामुळे जातीयवादी म्हणण्यात अर्थ नाही. शिवसेनेसोबत आम्ही जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो," असेही अजित पवार म्हणाले