आमचा उमेदवार घ्या, तुमचा द्या! लोकसभेसाठी राज्यात महायुतीचा नवा फॉर्म्युला

Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीत उमेदवार अदलाबदली फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यानुसार महाराष्ट्रात मिशन 45 साठी महायुतीतले उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

कपिल राऊत | Updated: Feb 29, 2024, 02:37 PM IST
आमचा उमेदवार घ्या, तुमचा द्या! लोकसभेसाठी राज्यात महायुतीचा नवा फॉर्म्युला title=

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत उमेदवारांच्या अदलाबदलीचा फॉर्म्युला (Candidates Swapping Formula) राबवला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) मिशन 45 पूर्ण करण्यासाठी महायुतीतील (Mahayuti) उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. या फॉर्मुल्याप्रमाणे पहिल्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) हे या फॉर्मुल्यातील पाहिले उमेदवार असतील.

या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करुन शिरुरमधून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यानुसार आणखीही काही नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि महाराष्ट्रातलं टार्गेट 45 पूर्ण करण्यासाठी महायुतीतील उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मात्र, शिवसेनेला जागा सुटली तर मी घड्याळ का हाती घेऊ अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिलीय. यावरूनच अमोल कोल्हेंनी आढळरावांना टोला लगावलाय. महायुतीला मित्रपक्षातून उमेदवार आयात करावा लागणं हीच माझ्या कामाची पोचपावती असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलंय.

शिरुरच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आता शिरुरचा दौरा करणारेत. 3 मार्चला अजित पवार शिरुरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुरसह भोसरी, हडपसर या सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतील. या दौऱ्यात तरी अजित पवारांना उमेदवार सापडतो का? महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होणार का? याकडे लक्ष लागलंय. 

मावळ मतदारसंघावरुन रस्सीखेच
शिंदे गटाच्या वाट्याला असणाऱ्या मावळ लोकसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपनंही दावा केलाय. मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतायत. मावळमध्ये भाजपचे तीन आमदार, दोन महापालिका, अनेक नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीवर सत्ता असल्यानं या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकलाय.

ठाणे जिल्ह्यात राजकारण तापलं
महायुतीचा ठाण्यातील उमेदवार निश्चित झालाय. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांना उमेदवारी देण्याची आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. ठाणे लोकसभा मतदारसंघातून रविंद्र फाटक महायुतीचे उमेदवार जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या विरुद्ध लढत होणार आहे. तर कल्याण लोकसभेचा आघाडीचा उमेदवार 8 दिवसात ठरेल. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी ही माहिती दिलीये. श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने विशेष लक्ष केंद्रित केलंय. अंधारेंनी कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या त्यावेळी अंधारेंनी कल्याण लोकसभा लढावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

संभाजीनगर भाजपकडे?
शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ भाजपनं मागितला असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिलीय. छत्रपती संभाजीनगरमधून आपण इच्छुक असल्याचंही कराड यांनी म्हटलंय. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी ते माढा मतदारसंघात आले होते, त्यावेळी त्यांनी संभाजीनगरच्या जागेबद्दल इच्छुक असल्याचं सांगितलं. 

कोकणातही भाजपाचा दावा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपनं दावा केल्याची चर्चा होती मात्र उदय सामंत यांनी चर्चा खोडून काढल्यात. जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा असेल असं उदय सामंत यांनी म्हटलंय, भाजपनं रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी निरीक्षक नेमला नसल्यानं त्या जागेवर भाजप दावा करणार नसल्याचं मतही सामंतांनी व्यक्त केलंय.. 

मविआची बैठक होणार नाही
जागावाटपासाठी मविआची यापुढे बैठक होणार नाहीये, वंचित बहुजन आघाडीसह मविआचं जागावाटप पार पडलंय. वंचितसह मविआचे प्रमुख नेते मुंबईतल्या मविआच्या बैठकीत उपस्थित होते, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार फोनवरुन बैठकीत सामील झाले होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सीटवर बैठकीत चर्चा झाली. यापुढे एकच बैठक होईल ज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे असतील, त्यानंतर पत्रकार परिषदेत जागावाटप सांगितलं जाईल, असं मविआकडून स्पष्ट करण्यात आलंय.