Maharashtra Weather News : अवकाळी, गारपीटीचं सावट दूर होईना; राज्याच्या 'या' भागांमध्ये येणार वादळ

Maharashtra Weather  News : राज्याच्या कोणत्या भागात कसं आहे हवामान? कुठे पावसाचा इशारा, कुठे कोरडं हवामान... पाहा सविस्तर वृत्त 

सायली पाटील | Updated: Apr 10, 2024, 09:17 AM IST
Maharashtra Weather  News : अवकाळी, गारपीटीचं सावट दूर होईना; राज्याच्या 'या' भागांमध्ये येणार वादळ  title=
Maharashtra Weather news rain prediction in vidarbha latest update in marathi

Maharashtra Weather  News : विदर्भामध्ये पावसानं तडाखा दिला असून, त्याचे थेट परिणाम शेतपिकांवर होताना दिसत आहेत. इथं राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह असताना मंगळवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना अवकाळीचा तडाखा बसला. वातावरणाची हीच स्थिती पुढील 24 तासांमध्येही कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

हवामान विभागाच्या मुंबई शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी आणि विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी साधारण ताशळी 30-40 kmph वेगानं वारे वाहण्याचीसुद्धा शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अवकाळीच्या दृष्टीनं ही वातावरणनिर्मिती होत असल्यामुळं विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

सध्या गुजरापतपासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, हा पट्टा महाराष्ट्रातूनच पुढे जात असल्यामुळं त्याचे परिणाम राज्यातील हवामानावर होताना दिसत आहेत. ज्यामुळं विदर्भातील तापमान काही अंशांनी कमी झालं आहे. तर, राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद सोलापुरात करण्यात आली आहे. तिथं मराठवाड्यात अवकाळी आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या धर्तीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : लोकसभा निवडणूक होऊ द्या मग...; राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शिंदे-फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

विदर्भ पट्ट्यामध्ये असणारं अवकाळी हवामान वगळता राज्यात वातावरण कोरडं राहणार आहे. 9 ते 11 एप्रिलदरम्यान कोकण वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये वातावरण ढगाळ असेल, तर मुंबईमध्ये उकाडा दिवसागणिक वाढत जाणार आहे. त्यामुळं मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागांमध्ये दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा इशारा प्रशासन देत आहे.