मराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे 'ही' मोहीम घेणार हाती

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी येत्या 20 जानेवारीला मुंबई गाठणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. एकदा गाव सोडलं तर आरक्षण घेऊनच येऊ असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.   

Updated: Jan 5, 2024, 09:48 PM IST
मराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे 'ही' मोहीम घेणार हाती title=

Maratha Reservation : आता आरक्षणाशिवाय माघार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतली आहे. यासाठी मुंबई धडक देणार असून आझाद मैदानात 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत. मुंबईत शांततेत जायचं अन शांततेत यायचं. कुणी जर धिंगाणा करायला लागला, गाडी पेटवायला लागला, तर जाग्यावर धरून पोलिसांकडे न्यायचं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला (Maratha Samaj) केलं आहे. मराठा आमदार खासदार आणि मंत्री यांना हात जोडून विंनती करतो. मराठ्यांच्या पोरांच्या पाठीमागे उभे रहा, नाहीतर मराठ्यांचे घर तुमच्यासाठी बंद राहतील. एकदा जर आम्ही गाव सोडलं तर चर्चा बंद, आम्ही आरक्षण (Reservation) घेऊनच येऊ असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.

आरक्षणानंतरही स्वस्थ बसणार नाही
आरक्षण मिळाल्यानंतरही शांत बसणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा समजाला आरक्षण मिळाल्यानंतरचा प्लान जरांगे यांनी आज त्यांच्या एका सभेत जाहीर केलाय. तुम्ही मला दारू पिणाऱ्यांच्या याद्या आणून द्या .मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर दारू पिणाऱ्यांना सरळच करतो असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी तळीरामांना (Drunkers) दिलाय. 

गोदाकाठच्या 123 गावांच्या गाठी भेटी दौऱ्यानिमित्त ते  घनसावंगी तालुक्यातील भोगगाव इथं बोलत होते. रात्रीचे 9 वाजले की मी माझा हात कोणाच्या हातात देत नाही, मला भीतीच वाटते आता. मी त्यांच्या हातात हात दिला तर ते माझा हात सोडतच नाही. मी इकडे ओढतो, तर ते तिकडे ओढतात. आरक्षणाचा विषय संपल्यावर  मद्यपीना सरळ करण्याची मोहीम हाती घेणार असून तुम्ही मला याद्या आणून द्या, मी त्यांचा कार्यक्रमच करतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. पिण्याच्या वेळेला त्यांच्या जवळ जाऊन मांडीच घालून बसतो. तो बाटली कसा उघडतो तेच बघतो मी असं जरांगे म्हटलेत. आता मला दारू पिणाऱ्या टोळीच्याच मागे लगावे लागेल असे म्हणत जरांगे पाटलांनी आता दुसरी मोहीम हाती घेतली आहे

राज्य सरकारला इशारा
मुंबई पायी मोर्चात आमचे ट्रॅक्टर अडवले, आम्हाला त्रास दिला तर आमच्या महिलांनी चपला का काढू नये असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय. मागासवर्ग आयोगाने मराठा समाज मागास आहे की नाही हे तपासण्यासाठी तयार केलेली प्रश्नावली तपासणार असल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलंय

छगन भुजबळांना इशारा
पंढरपूर मध्ये शनिवारी म्हणजे 6 जानेवारीला ओबीसी महा यल्गार मेळावा होणार आहे. त्या पूर्वी मराठा कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. जरा मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यावर टीका कराल तर चपलेचा हार घालू असा इशारा मराठा कार्यकर्ते रामभाऊ गायकवाड यांनी थेट मंत्री भुजबळांना इशारा दिला आहे. मंत्री छगन भुजबळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. 

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
मी पंढरपूरला जाणारच आहे ,आणि जर चप्पल फेकणार असेल तर त्याचा मी स्वागतच करेल असं मत आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे,  मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मुंबईला जाण्याच्या भूमिकेबाबत बोलताना,मंत्री भुजबळ यांनी देशात लोकशाहीचे राज्य आहे,त्यामुळे कोणी कुठेही जाऊ शकते,कुठेही मोर्चे काढू शकते,अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली आहे