'तुमच्याविरोधात ठोस पुरावे...', हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दांपत्याला मोठा धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली

हनुमान चालिसा पठण प्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 19, 2023, 05:34 PM IST
'तुमच्याविरोधात ठोस पुरावे...', हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दांपत्याला मोठा धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली  title=

हनुमान चालिसा पठण प्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने दोघांविरोधात पुरावे तसंच साक्षीदार असल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. राणा दांपत्याने याप्रकरणी दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. आज यावर न्यायालय निर्णय देणार होतं. पण आज कोर्टाने दोघांविरोधात ठोस पुरावे आहेत सांगत याचिका फेटाळून लावली. आता 5 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. 

राणा दांपत्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसाचं पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर त्यांना 23 एप्रिलला अटक करण्यात आली होती. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याविरोधात कलम 153 अ आणि 135 अंचर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या दोघेही जामीनावर बाहेर आहेत. 

दरम्यान राणा दांपत्याने आपल्याला दोषमुक्त केलं जावं अशी याचिका मुंबई सत्र न्यायालयात केली आहे. कोर्टाने दोघांविरोधात पुरावे आणि साक्षीदार आहेत असं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. पोलिसांनी राणा दांपत्याच्या याचिकेला विरोध केला होता. कोर्टाने दोघांविरोधात ठोस पुरावे असल्याचं सांगितलं आहे. आता 5 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. 5 जानेवारीला नवनीत राणा आणि रवी राणा यांना कोर्टात हजर राहावं लागणार आहे. 

कोर्टात गैरहजर असल्याने फटकारलं होतं

नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना 10 ऑगस्टला सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. राणा दाम्पत्य न्यायालयात हजर झालं नव्हतं. यानंतर पुढील सुनावणी 28 ऑगस्टला ठेवण्यात आली होती. याआधीही राणा दांपत्य कोर्टात गैरहजर राहिलं होतं. या प्रकरणाची सुनावणी करणारे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी खेड बोल सुनावताना न्यायालय म्हणजे मस्करी नाही असं म्हटलं होतं. 

 हनुमान चालिसाचा नेमका वाद काय?

मागील वर्षी एप्रिल महिन्यात राण दांपत्याने मातोश्रीबाहेर 'हनुमान चालिसा'चं पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मातोोश्रीबाहेर जमले होते. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तर दुसरीकडे राणा दांपत्य माघार घेण्यास तयार नव्हता. 

शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. यानंतर राणा दाम्पत्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतर राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.