"महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण..."; 'काही सहकारी बळी पडले' म्हणत शरद पवारांचं सूचक विधान

NCP President Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाध्यक्ष शरद पवारांनी जाहीर भाषण केलं. कराडमधील प्रतीसंगमावरुन केलेल्या भाषणामध्ये शरद पवारांनी भाजपावरही निशाणा साधला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 3, 2023, 12:55 PM IST
"महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण..."; 'काही सहकारी बळी पडले' म्हणत शरद पवारांचं सूचक विधान title=
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांचं पहिलंच सार्वजनिक भाषण

NCP President Sharad Pawar On Ajit Pawar: पुतण्या अजित पवार यांनी पक्षाविरोधात पुकारलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच जाहीर भाषणात या बंडखोरीबद्दल भाष्य केलं आहे. राजकीय उलथापालथ करणाऱ्या घटकांना असा उल्लेख करत शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. अजित पवारांच्या बंडाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत आपल्यापैकी काही सहकारी भाजपाच्या प्रवृत्तीला बळी पडल्याचंही शरद पवार यांनी कराडमधील प्रतीसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरुन केलेल्या भाषणात म्हटलं.

समाजविघातक प्रवृत्तीविरोधात उभं राहण्याची गरज

"महाराष्ट्र राज्य हे बंधुत्व, इमानदारीचं पुरस्कार करणारं राज्य आहे. पण मध्यंतरीच्या काळात संगमनेर, अकोला असो अशी काही ठिकाण आहेत ज्यांची नावं घेता येतील तिथे पिढ्या अन् पिढ्या एकत्र राहणाऱ्यांमध्ये एक प्रकारची वैर भावना वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि जातीय दंगली झाल्या. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. पण केवळ असं म्हणून भागणार नाही. या समाजविघातक प्रवृत्तीविरोधात उभं राहण्याची गरज आहे. तेच काम आपण महाराष्ट्रात करत होतो," असं म्हणत शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख करत भाजपाने अनेक राज्यांमध्ये सत्ता उलथवण्याची कामं केल्याचं म्हटलं.

उद्धव ठाकरे सरकारचा उल्लेख

"एक काळ असा येऊन गेला की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्राची सेवा करत होते. आज तेच सरकार या ना त्या पद्धतीनं उलथून टाकण्याचं काम काही लोकांनी केलं. हे काम देशातील अनेक राज्यांमध्ये केलं. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित चालेलं राज्य उलथून टाकलं आणि तिथे जातीय संघीय वृत्तीला प्रोत्साहन देणारं राज्य सत्तेत आणलं. दिल्ली, पंजाबमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, हिमाचलमध्ये, उत्तरखंडमध्ये आहे अनेक राज्यांमध्ये इतरांचं सरकार आहे. चुकीच्या प्रवृत्तींमुळे एक प्रकारचा संघर्षाचा काळ आहे," असं शरद पवार यांनी इतर राज्यांमधील परिस्थितीचा उल्लेख करत म्हटलं.

नक्की वाचा >> अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा 'भाकरी'ची चर्चा! पण 'भाकरी फिरवणे'चा नेमका अर्थ काय?

"दुर्देवाने तुमच्या आमच्यातील काही सहकारी याला बळी पडले पण..."

"चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या राज्यांमध्ये लोकशाही पद्धतीने काम करत राष्ट्रीय पक्षाला झटका देण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न आणि त्यासंदर्भातील भूमिका एकच आहे, हा जो जातीय विचार आहे त्यामधून देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न या सर्व घटकांचा आहे. महाराष्ट्रातील उलथापालथ करण्याची भूमिका याच प्रवृ्त्तीने घेतली. दुर्देवाने तुमच्या आमच्यातील काही सहकारी याला बळी पडले. पण ठीक आहे, एखादी व्यक्ती बळी पडले असेल, समूह बळी पडला असेल तर शाहू-फुले-आंबेडकर आणि चव्हाणांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण तो महाराष्ट्राची सामुहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास शरद पवारांनी अजित पवारांच्या बंडखोरीबद्दल सूचक विधान करताना केलं.

नक्की वाचा >> फडणवीस अन् अजित पवारही उपमुख्यमंत्री! 22 जुलैला जुळून येणार अनोखा योगायोग

फार अवधी शिल्लक नाही लवकरच...

भाजपावर निशाणा साधताना शरद पवारांनी जनता लवकरच त्यांना जागा दाखवले असं म्हटलं आहे. "उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याला फार अवधी नाही. वर्ष सहा महिन्यामध्ये पुन्हा एकदा लोकांसमोर जायची संधी येईल. त्यावेळेला ही राज्या राज्यातील लोकशाहीच्या वर्गाकडून, शांततेवर विश्वास असणाऱ्या वर्गाकडून या शक्तीला धक्का दिला जाईल. या प्रवृत्ती पूर्णपणे बाजूला करुन महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर, कष्ट करणाऱ्यांचं राज्य म्हणून आपण निर्माण करु," असंही पवार भाषणाच्या शेवटी म्हणाले.