लॉकडाऊन काळात वाढलेल्या वीज बिलातून ग्राहकांना दिलासा

भरमसाठ बिलाचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप 

Updated: Oct 13, 2020, 05:59 PM IST
लॉकडाऊन काळात वाढलेल्या वीज बिलातून ग्राहकांना दिलासा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ बिलाचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला. पण या ग्राहकांना यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमध्ये वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. आज विधानसभा अध्यक्षांनी लॉकडाऊनमधील वाढीव वीज बील प्रश्नाबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यामध्ये ऊर्जा आणि वित्त विभागाचे अधिकारी, वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

लॉकडाऊन काळात राज्य सरकारने सांगितलं म्हणून लोक घरात थांबली, त्यात त्यांना वाढीव वीज बिल देण्यात आली. त्यामुळे शासनाने या घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा असे निर्देश अध्यक्षांनी यावेळी दिले. 

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाबाबत वित्तमंत्र्यांशी चर्चा करून दिलासा देण्याचा प्रयत्न करून असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावेळी दिले. त्यामुळे वाढीव बिलाने मनस्ताप झालेल्या ग्राहकांना तुर्तास दिलासा मिळालाय.