महाराष्ट्रातील अनोखा किल्ला, आसपास समुद्र नाही तरी नाव आहे सागरगड; शिवाजी महाराजांची दूरदृष्टी

अलिबाग जवळील सागरगड किल्ला. जाणून घेवूया किल्ल्याचे वैशिष्ट्य. 

वनिता कांबळे | Updated: Mar 12, 2024, 11:30 PM IST
महाराष्ट्रातील अनोखा किल्ला, आसपास समुद्र नाही तरी नाव आहे सागरगड; शिवाजी महाराजांची दूरदृष्टी title=

Sagargad Fort : सागरी मार्गे आक्रमण करणाऱ्या शत्रुंना रोखण्यासाठी तसेच शत्रुंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग, रत्नदुर्ग यांसारखे अनेर रत्नदुर्ग बांधले. मात्र, महाराष्ट्रात एक असा अनोखा किल्ला आहे ज्याच्या आसपास समुद्र नाही.  तरीही या किल्ल्यांवरुन थेट समुद्रावर लक्ष ठेवले जातो. सागरगड असे या किल्ल्याचे नाव आहे. या किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा अंदाज येतो. 

सागरगड हा तसा दुर्लक्षित किल्ला आहे. अलिबागजवळील डोंगरावर सागरगड वसलेला आहे. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी प्रत्यक्षात हा किल्ला समुद्रकिनार्‍यापासून तब्बल पाच मैल दूर आहे. राजाने सागरी किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला.

अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती होण्याआधी सागरडवरुनच सागरी किनारपट्टीवर लक्ष ठेवले जात होते. यामुळे प्रत्यक्षात समुद्र किनारी नसला तरी हा किल्ला सागरी समीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात होता. 

सागरगड किल्ल्याचा इतिहास

सागरगड किल्ला हा कोणी आणि कधी बांधला याची कोणतीही उपलब्ध नाही. मात्र, या किल्ल्याची रचना पाहता हा किल्ला निजामशाहीत बांधला गेला असावा असे इतिहास तज्ञ सांगतात. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. पुरंदरच्या तहात हा किल्ला शिवाजी महाराजांनी मिळवला. 

असा आहे सागरगड किल्ला

सागरगड किल्ला ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी एक ओढा आहे.  ओढा ओलांडून डोंगराच्या पायथ्याशी जावे लागते. किल्ल्याची चढण नागमोडी वळणाच्या वाटेवरुन जाते. यामुळे ट्रेकिंग करताना थोडीशी दमछाक होते. किल्ल्यावरील उंचवट्याला चार मीटर उंचीची तटबंदी आहे. तसेच 5 बुरुज बांधून बालेकिल्ला बनवण्यात आला आहे.  किल्ल्यावर मंदिर आणि पाण्याचे कुंड आहे. या कुंडातील गोमुखातून नितळ पाण्याची संततधार पडत असते. या किल्ल्यावरुन खांदेरी- उंदेरी हे किल्ले दिसतात. तसेत अलिबागचा समुद्रकिनारा, धरमतरची खाडी, माथेरान, प्रबळगड हे किल्ले तसेच चौलची खाडी असा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो.

सागरगड किल्ल्यावर जायचं कसं?

मुंबई - अलिबाग रस्त्यावर सागरगड हा किल्ला आहे. मुंबई - अलिबाग रस्त्यावरील खंडाळे गावातून सागरगड किल्ल्यावर जाता येते. कार्ला खिंड ओलांडल्यावर अलिबागच्या अलिकडे चार  किमी अंतरावर खंडाळे गाव आहे.