कांडच्या आड कुणी दुसऱ्याने कांड केलय काय? 26/11 हल्ला प्रकरण, उज्वल निकम यांनी खुलासा करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान

26/11 च्या हल्ल्यावेळी एका पोलीस अधिका-यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला. हेमंत करकरेंच्या शरिरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर आरोप केले होते. मात्र हेच आरोप वडेट्टीवारांना भोवण्याची शक्यता आहे...

Updated: May 11, 2024, 05:42 PM IST
कांडच्या आड कुणी दुसऱ्याने कांड केलय काय? 26/11 हल्ला प्रकरण, उज्वल निकम यांनी खुलासा करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान  title=

Prakash Ambedkar On Ujjwal Nikam  : हू किल्ड करकरे या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता आणखीच चिघळला आहे. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. हेमंत करकरे आणि विजय साळसकरांच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केले आहेत.  दोघांच्या हत्येमागे ‘गेम विदीन गेम’ आहे का? अस प्रश्न उपस्थित करत उज्ज्वल निकम यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

मुंबईवर  26/11 च्या हल्ल्यातील अनेक गोष्टी दडपल्या गेल्या आहेत. हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेल्या पाच गोळ्या या कसाब आणि अबू ईस्माईलच्या बंदुकीतून निघालेल्या नाहीत. तसंच साळस्करांच्या शरीरातील दोन गोळ्यांचेही तसेच आहे. या घटनेआडून कुणी डाव साधला याचा खुलासा उज्वल निकम यांनी करावा. तसंच त्या गोळ्या कुणाच्या बंदुकीतून निघाल्या याचा अधिक तपास करण्याची विनंती त्यांनी का केली नाही. निकम यांनी दोन दिवसांत हे स्पष्ट करावे.

पाकिस्तानचा दहशतवाद होता यात दुमत नाही. पण, गेम विदीन गेम... कांडच्या आड कुणी दुसऱ्याने कांड केलंय का याचा खुलासा निकम यांनी करावा. बुलेट मॅच झाल्या नाहीत. मग या बुलेट कुठल्या शस्त्रातल्या होत्या. पोलिसांच्या की बिगर पोलिसांच्या. यासंदर्भातली चौकशी, चौकशी अधिकाऱ्याकडे का केली नाही. कोर्टाला ही बाब नजरेस आणून का दिली नाही असे प्रश्न .प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले  आहेत.

'हू किल्ड करकरे' या पुस्तकाचा वाद नेमका आहे तरी काय?

2007 मुंबईत दहतवादी हल्ला आणि दहशतवादी अजमल अमीर कसाबचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजप नेते उज्ज्वल निकमांवर टीका करताना मुंबईचे माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिलाय.. हल्ल्यावेळी एका पोलीस अधिका-यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला, हेमंत करकरेंच्या शरिरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर आरोप केलेत.

उज्वल निकम यांची करकरे गोळीबारप्रकरणी काँग्रेसवर जोरदार टीका

उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांनी करकरे गोळीबारप्रकरणी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. काँग्रेसने जनतेची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. करकरे, कामटे आणि साळस्कर यांना कसाबनेच मारलं आहे, असं सुप्रीम कोर्टातही सिद्ध झालंय. तरीही संभ्रम निर्माण करता, न्यायव्यवस्थेवर शंका घेता, याची काँग्रेसला लाज वाटली नाही का?, असा सवाल निकमांनी  केला.