'पीक कर्जासाठी मुख्यमंत्री परदेशातून येईपर्यंत वाट पहायची?'

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

Updated: Jun 17, 2018, 09:58 AM IST
'पीक कर्जासाठी मुख्यमंत्री परदेशातून येईपर्यंत वाट पहायची?' title=

शिर्डी : आता पेरणीची वेळ असताना पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री परदेशातून येईपर्यंत वाट बघायची का? असा संतप्त सवाल, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

पीककर्जासंदर्भात राज्यभरातून तक्रारी येत असताना सरकारकडून तातडीनं पावलं उचलली जात नाहीत. मुख्यमंत्र्यांनी परदेशात जाताना वरिष्ठ मंत्र्यांच्या एका समितीकडे कार्यभार सोपवला होता. तरीही पीक कर्जासारख्या महत्त्वाच्या निर्णयावर अनेक मंत्री मिळूनही तातडीनं निर्णय घेऊ शकत नाही. उलट यासंदर्भात मुख्यमंत्री परदेशातून आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं राज्यातले वरिष्ठ मंत्रीच सांगतात. सरकारच्या अकार्यक्षमतेचाच हा मोठा पुरावा असल्याचा आरोप, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

पावसाळा सुरु झाला असताना अजूनही शेतकऱ्यांना पिककर्ज मिळत नाहीये मात्र, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, मुख्यमंत्री परत आल्यावर निर्णय घेवू असं राज्याचे अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार औरंगाबादमध्ये म्हटलयं.