परिचारिका भरतीसाठी आलेल्या महिलांना जमिनीवर बसवले; ठाणे महानगरपालिकेतील अजब प्रकार

ठाणे महानगरपालिका परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसबण्यात आल्याच प्रकार उघडकीस आला आहे.  यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

Updated: Aug 29, 2023, 05:45 PM IST
परिचारिका भरतीसाठी आलेल्या महिलांना जमिनीवर बसवले; ठाणे महानगरपालिकेतील अजब प्रकार  title=

Maharashtra Health Department Recruitment 2023 : सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे मुंबईत पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणांना जमीनीवर झोपावे लागले होते. असाच काहीसा प्रकार ठाण्यात घडला आहे.  ठाणे महानगरपालिका परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसबण्यात आल्याच प्रकार उघडकीस आला आहे.  याचा बोभाटा झाल्यानंतर  महापालिका प्रशासनानं तात्काळ सभागृहात बैठक व्यवस्था करण्यात आली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात महानगरपालिका भवनात परिचारिका भरती साठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवण्यात आल्याच प्रकार घडला. विशेष म्हणजे यात काही अपवाद वगळता सर्वच उमेदवार या महिलाच होत्या. ठाणे महापालिके तर्फे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कंत्राटी परिचारिका पदासाठी 72 जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती आज सुरू झाल्या आहेत.

72 पदासांठी 500 उमेदवार

या 72 पदांसाठी राज्यभरातून जवळपास 450 हुन जास्त उमेदवार आल्याने त्यांची व्यवस्था करायची कुठे असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला. त्यामुळे त्यातील काही उमेदवारांना चक्क पहिल्या माळ्यावर असणाऱ्या लॉनच्या आणि महापौर कार्यालयाच्या मध्ये असणाऱ्या व्हरांड्यातील जमिनीवरच बसवण्यात आले. मुलाखतीचा नंबर आल्यावर तिसऱ्या मजल्यावर त्यांना पाठवण्यात येत असे.

आक्षेप घेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट झाला आक्रमक

सदरचा प्रकार लक्षात आल्यावर तसेच पत्रकरांनीही याबाबत प्रशासनाला विचारणा केल्यावर तात्काळ या सर्व उमेदवारांना पालिकेच्या सभागृहात बसवण्यात आलं. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही (अजित पवार गट) आक्रमक पवित्रा घेत पालिकेच्या उपायुक्त कार्यालयात धडक देत पालिकेला यबाबत जाब विचारला. 

ठाणे महापालिकेचा खुलासा

दरम्यान आम्ही आलेल्या सर्व उमेदवारांची योग्य ती काळजी घेतली असून त्यांना सकाळी सभागृहातच बसवण्यात आल होते. मात्र गणपती उत्सवा संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने फक्त काही काळासाठी त्यांना बाहेर बसवण्यात आल होत त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय झाली नसल्याचा ठाम दावा महापालिका प्रशासनाने केला. 

आरोग्य विभागात 11 हजार पदांची भरती

आरोग्य विभागात 11 हजार पदांची भरती केली जाणार आहे. आजपासून भरती प्रक्रियेला सुरूवात होणार असून आजच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडल्यानं तरूणांमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र आता आजपासून भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.