'महाराष्ट्राची ओळख पुसून टाकण्याचा डाव, आता महानंद प्रकल्प गुजरातला हलवण्याची तयारी'

Mahanand Dairy : महाराष्ट्राची ओळख असलेला महानंद प्रकल्प गुजरातला हलवण्याची तयारी असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. असा प्रयत्न केल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 3, 2024, 03:03 PM IST
'महाराष्ट्राची ओळख पुसून टाकण्याचा डाव, आता महानंद प्रकल्प गुजरातला हलवण्याची तयारी' title=

मुंबई : महानंदा डेअरी गुजरातला नेण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती ओळख पुसून टाकली जातेय यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार घोटाळा दिसून येत नाही का...? असा सवाल विचारत महानंद (Mahanand Milk Project)  नेण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा राऊतांनी दिलाय. राज्यातील प्रमुख उद्योग आणि व्यवसाय गुजरातला (Gujrat) हलवल्यानंतरआता महाराष्ट्राचा प्रमुख महानंद डेअरी प्रकल्प राष्ट्रीय डेअरी डेव्हलपर बोर्डाच्या हवाली करून गुजरातच्या अमूल डेअरीत विलीन करण्याचा डाव असल्यााच आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी दुग्ध महासंघाची आर्थिक स्थिती खराब असल्याचा हवाला देत महानंद दूध प्रकल्प राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे. एनडीबीबीकडे प्रकल्प सोपवण्याआधी महानंदतल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जाईल, असा आरोपही करण्यात आलाय. महानंद दूध प्रकल्वासाठी सध्यस्थितीत जवळपास 940 कर्मचारी काम करतात. इतक्या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा आर्थिक भार वाचवण्यासाठी एनडीडीबीकडून जवळपास 450 कर्मचाऱ्यांची कटोती केली जाईल असंही सांगितलं जात आहे. 

महाराष्ट्रातील अनेक उद्योग राज्यातून बाहेर घेऊन जाण्याचा डाव आहे, आता दूध प्रकल्पही राज्याच्या बाहेर विशेषत: गुजरातला घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्य सरकारने महानंद ब्रांड विकसित करण्याची गरज आहे. हा प्रकल्प गुजरातला हलवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने हाणून पाडलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचं सरकार बनलं आहे, एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं झाली आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातून दररोज एक व्यवसाय गुजरातला नेला जात आहे, आणि महाराष्ट्र सरकार तोंडला कुलूप लावून बसलं आहे. हे कसले महाराष्ट्राचे राज्यकर्ते असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनाचं मोठं जाळं असून त्यासाठी राज्यात अमूलचं असण्याची गरज नाही, कर्नाटकातही नंदिनी दूध प्रकल्प मारण्याचा केंद्र सरकारने असाच प्रयत्न केला. संपूर्ण विधानसभा निवडणूक नंदिनी दूध प्रकल्पावर लढवली गेली. महाराष्ट्रतही प्रकार सुरु असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.