'मुंबईत गुजरातींची मस्ती भाजपमुळे वाढली' आदित्य ठाकरेंचा निशाणा...

Aaditya Thackeray To The Point Loksabha Election 2024 : भाजपमुळे मुंबईत गुजरातीत माणसाची मस्ती वाढली असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसंच भाजप सरकार आल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केलीय.

राजीव कासले | Updated: May 8, 2024, 03:24 PM IST
'मुंबईत गुजरातींची मस्ती भाजपमुळे वाढली' आदित्य ठाकरेंचा निशाणा...  title=

Aaditya Thackeray To The Point Loksabha Election 2024 : मुंबईत गुजरातींची मस्ती भाजपमुळं वाढली, अशा शब्दांत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधलाय. मराठी माणसांना गुजराती सोसायट्यांमध्ये प्रचारासाठी मनाई केली जाते... भाजपमुळं ही मस्ती वाढलीय, असं त्यांनी सांगितलं. भाजपचं सरकार डोक्यावर बसल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील. मटण खायचं की भाजी तेच सांगतील, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. भाजपला स्वातंत्र्य हिरावून घ्यायचंय आणि भारताचा चीन करायचाय, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. झी 24 तासच्या 'टू द पॉईट' (To The Point) या कार्यक्रमात कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केलाय.

आदित्य ठाकरेंचा निशाणा
तुम्ही ज्या राज्यात आहात त्या राज्याचा विचार करणार नाही का?  भाजप संविधान बदलू इच्छितोय,  भाजपला लोकशाही संपवायची आहे,  भाजपाला मित्रपक्ष नकोत,  भाजपाला मुंबई तोडायची आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. ईशान्य मुंबईत एका सोसायटीत मराठी प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला नाही, ही मस्ती भाजपामुळे वाढलीय. असं वातावरण याआधी कधीही मुंबईत नव्हतं. मुंबई विरोधी, महाराष्ट्र विरोधी कारवाई भाजप करत त्या भाजपबरोबर आम्ही राहू शकत नाही असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

भाजपने मुंबई विरोधी उमेदवार दिले आहेत, मिहिर कोटेचा, पियुष गोयल असे उमेदवार मुंबईत देण्यात आले आहेत. पियुष गोयल यांनी केंद्रात असताना गेल्या दहा वर्षात मुंबईसाठी काही आवाज उठवला आहे का? असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलाय.

मनसेच्या बिनशर्त पाठिंब्यावर टीका
मनसेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. गुजरात आणि गुजराती समाजाशी आमचं काही भांडण नाही. पण मुंबईतून जेव्हा गुजरातला उद्योग नेले जातात तिथे मी नडणार. मुंबईत मराठी माणसाला जॉब नाकारला जातो, गुजराती सोसायटीत मराठी माणसाला प्रवेश दिला जात नाही किंवा मुंबईतले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत, त्यालाही मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. मनसेने डेरासरबाहेर चिकन टांगून आंदोलन केलं होतं, तीच मनसे आता भाजपबरोबर आहे, जैन समाज आता त्या भाजपसोबत राहाणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत, ते म्हणजे मराठी नाहीत ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, मराठी माणसाला मुंबईतून निर्वासित करण्याचं काम ठाकरेंनीच केलंय. त्यामुळे त्याबाबत ठाकरेंनी बोलू नये, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिलंय.