जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीला आाता एक वर्षाहून कमी कालावधी राहिला आहे. महायुती आणि महाआघाडीत जागावाटपावरुन रणनिती सुरु आहे. पण संभाव्य जागावाटपावरुन मविआत काँग्रेस एकाकी पडलीय, पवार-ठाकरेंकडे काँग्रेसनं अतिरिक्त जागांची मागणी केलीय..

कपिल राऊत | Updated: Nov 16, 2023, 08:25 PM IST
जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी title=

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्यात. मात्र जागावाटपावरनं काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Group) आणि शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) मतभेद आहेत. याला कारण ठरतंय काँग्रेसनं केलेली जादा जागांची मागणी. लोकसभेसाठी काँग्रेसला ठाकरे आणि पवार गटापेक्षा अतिरिक्त जागा मिळाव्यात असा काँग्रेसचा (Congress) प्रयत्न आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा कल काँग्रेसच्या बाजूनं असल्याचा अंदाज अनेक सर्व्हेंमधून वर्तवण्यात आलाय.. त्याच्याच जोरावर बार्गेनिंग पॉवर वाढली असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय. हा दावा पवार आणि ठाकरे गटाला मान्य नसल्यानं काँग्रेस एका बाजूला आणि पवार-ठाकरे एका बाजूला असं चित्र निर्माण झाल्याचं बोललं जातंय. 5 राज्यांच्या निकालांनंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग होणार असल्याचा दावाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय..

दरम्यान काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी केली गेली असली तरी मविआच्या तीनही मुख्य पक्षात जागावाटप आधीच झालं असल्याचा दावा पवारांनी केलाय. प्राथमिक चर्चेनुसार महाविकास आघाडीत लोकसभेला ठाकरे गट एकोणीस ते एकवीस जागा, काँग्रेस तेरा ते पंधरा जागा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी दहा ते अकरा जागा लढवू शकते. मात्र, या संभाव्य फॉर्म्युल्यावर फेर विचारला बळ मिळावं म्हणून काँग्रेस निवडणूक निकालांनंतर अतिरिक्त जागांचा दावा करू शकतं. 

तीन पक्ष एकत्र आल्यामुळे आधीच प्रत्येक पक्षाला थोडंफार अॅडजस्ट करावं लागणार आहे. त्यामुळेच लोकसभेसाठी काँग्रेसला अतिरिक्त जागा देण्यास पवार-ठाकरेंचा विरोध असल्याची माहिती आहे. जागावाटपात एकमत झालं नाही तर काँग्रेस स्वबळावर आणि पवार-ठाकरे एकत्र लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

महायुतीतही जागा वाटपावरुन राडा
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीये. राज्यात महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे एकजुटीनं ही निवडणूक लढवण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर आहे.या निवडणुकीसाठी भाजपचा फॉर्म्युलाही उघड झाल्याची चर्चा आहे. या फॉर्म्युल्यानुसार जुन्या नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पाच ते आठ खासदारांऐवजी नवे चेहरे देणे गरजेचं असल्याचं भाजप श्रेष्ठींचं मत असल्याची माहिती समोर येतेयं. भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटातील काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी 2, तर मुंबईतील एका जागेवारील उमदेवार बदलण्याची नितांत गरज असल्याचं मत भाजपच्या सर्व्हेमध्ये करण्यात आलं.