राज्यातील स्थलांतरित मजूर, गरीब भुकेलेला राहणार नाही - अनिल देशमुख

स्थलांतरित मजूर तसेच गरीब भुकेलेला राहणार नाही,अशी ग्वाही, अनिल देशमुख यांनी दिली आहे. 

Updated: Apr 1, 2020, 02:07 PM IST
राज्यातील स्थलांतरित मजूर, गरीब भुकेलेला राहणार नाही - अनिल देशमुख title=

मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना विषाणु संसर्गामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातला कोणताही स्थलांतरित मजूर तसेच गरीब भुकेलेला राहणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेईल ,अशी ग्वाही, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांनी काल मुंबईत भायखळ्यातल्या रिचर्डसन क्रुडास कंपनीच्या आवारात उभारलेल्या निवारा छावण्यांना भेट देऊन स्थलांतरित मजुरांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस करत  त्यांना अन्नधान्याचं वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. 

आजची आपली भेट म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात व्यक्त केलेल्या सरकारच्या बांधिलकीचाच एक भाग आहे असही ते म्हमालेत. राज्यात सध्या असलेले आदिवासी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, गरीब, हे कुठल्या राज्यातले आहेत याचा विचार न करता, सरकार त्यांचे हाल होऊ देणार नाही, त्यादृष्टीने अशा सर्व जणांची माहिती घेण्यात येत आहे. त्यांना तात्काळ मदत करावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.