राज्यात दडी मारुन बसलेला मान्सून पुन्हा सक्रिय

पावसाची पुन्हा दमदार हजेरी

Updated: Jun 23, 2018, 03:37 PM IST
राज्यात दडी मारुन बसलेला मान्सून पुन्हा सक्रिय title=

मुंबई : जूनच्या मधल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्यावर आता पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. पुढच्या दोन आठवड्यात राज्याच्या विविध भागात मान्सून सक्रिय होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत पावसाने जोरदार कमबॅक केलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. मुंबईत परळ, दादर, माहीम, वांद्रे, अंधेरी, मालाड, कांदिवली आणि बोरीवलीत जोरदार पाऊस सुरु आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे.

तिकडे पालघर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीय. पहाटे पासून जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर शहरासह ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीय. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन परिसरात पाऊस सुरु आहे. येत्या २४ तासांत कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

वसई विरार परीसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहाटे 4 पासूनच या ठिकाणी पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे वसईच्या समता नगर, साई नगर, ओम नगर, या भागात रसत्यावर पाणी साचलंय. आता पावसाचा जोर कमी झालाय.  तर नालासोपारा आणि विरारमध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय.