बीपीसीएल स्फोट आगीनंतर शिवसेनेचा मोर्चा

 शिवसेनेनं मोर्चाचं आयोजन केलं होतं. 

Updated: Aug 11, 2018, 04:14 PM IST

मुंबई : बुधवारी बीपीसीएल कंपनीत झालेला स्फोट आणि आगीच्या दुर्घटनेमुळे परिसरात अजूनही भीतीचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोर्चाचं आयोजन केलं होतं. परिसर प्रदूषणमुक्त व्हावा, सुरक्षा आणि वाहतुकीच्या समस्या दूर कराव्या अशा मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचे  स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी सांगितले. जोपर्यंत स्थानिकांच्या सुरक्षेबाबत व्यवस्थापन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत कंपनीत काम पुन्हा सुरु करू देणार नाही, असा इशारा शिवसेनेनं बीपीसीएल व्यवस्थापनाला दिलाय. माहुल आणि आसपासचा परिसर काल रात्री पुन्हा मोठ्या आवाजानं हादरला. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे.

पुन्हा वायूप्रवाह सुरु ?

BPCL कंपनीनं पुन्हा वायूप्रवाह सुरु केल्याचा स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांचा आरोप आहे. बुधवारी बीपीसीएल कंपनीत आग लागली होती.  
आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर काल रात्री BPCL कंपनीने गुपचूप पुन्हा वायू प्रवाह सुरु केल्याचा आमदार तुकाराम काते यांचा दावा आहे.