''तुम्ही जिंकले, मी हरलो'' असं नितिन गडकरी यांना धीरुभाई अंबानी का म्हणाले होते...

ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा राज्यात युतीचं म्हणजे शिवसेना आणि भाजपाचं सरकार होतं. नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेचं काम सुरु होणार होतं. 

Updated: May 19, 2022, 08:01 PM IST
''तुम्ही जिंकले, मी हरलो'' असं नितिन गडकरी यांना धीरुभाई अंबानी का म्हणाले होते... title=

मुंबई : ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा राज्यात युतीचं म्हणजे शिवसेना आणि भाजपाचं सरकार होतं. नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेचं काम सुरु होणार होतं. अनेक खासगी कंपन्या हे काम करण्यासाठी इच्छुक होत्या, यात धीरुभाई अंबानी देखील होते. धीरुभाई अंबानी म्हणजे मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांचे वडिल, रिलायन्सचे सर्वेसर्वा. धीरुभाई अंबानी यांनी ३६०० कोटी रुपयांचं टेंडर भरलं होतं. म्हणजे आमची कंपनी हा एक्सप्रेसवे ३६०० कोटीरुपयात बांधून देईल.

तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांनी धीरुभाई अंबानी यांचं ३६०० कोटी रुपयांचं टेंडर अमान्य केलं. 

नितिन गडकरी यांनी थेट धीरुभाई अंबानी यांना सांगितलं की, २ हजार कोटीत हा रस्ता बनवा, नाहीतर आम्ही तो २ हजार कोटी बनवून तयार करु.

धीरुभाई अंबानी यांचं टेंडर कापलं गेल्याने ते नाराज झाले, त्यांनी नितिन गडकरी यांच्याशी संवाद साधला आणि म्हणाले, ''सरकारकडे एवढी साधनसामुग्री आहे का? की एवढ्या मोठ्या रस्त्याचं काम ते पूर्ण करतील, गडकरीसाहेब तुम्ही नको तिथं जिद्द करु नका'', असा सल्लाही यावेळी धीरुभाई अंबानी यांनी नितिन गडकरी यांना दिला.

नितिन गडकरी हे ऐकून अजिबात डगमगले नाहीत, उलट म्हणाले मी लहान माणूस आहे, मी हा प्रयत्न करुन पाहातो. पण गडकरी जिद्दीवर कायम होते, स्पर्धेत कायम होते, ते धीरुभाईंना म्हणाले, जर २ वर्षात मी हा हायवे पूर्ण करुन दाखवला तर, तुम्ही काय पैज लावता ते सांगा?

यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे तयार करण्याचं काम सुरु झालं, हे काम २ वर्षाच्या आत पूर्ण झालं, एवढंच नाही या कामाला खर्च आला फक्त १६०० कोटी रुपये.

यावरुन ३६०० कोटी रुपयांचं काम, गडकरी यांनी २ हजार कोटींवर आणलं, आणि परत फक्त १६०० कोटीत पूर्ण केलं, म्हणजेच राज्याच्या तिजोरीतले २ हजार कोटी रुपये वाचवले..

यानंतर धीरुभाई अंबानी यांनी नितिन गडकरी यांना बोलावलं आणि सांगितलं, गडकरीजी आप जित गए मै हार गया.

धीरुभाई अंबानी यांचं मन एवढं मोठं होतं की, काही दिवसांनी अमेरिकेचे बिल क्लिंटन हे भारतात आले. बॉम्बे स्टॉक्स एक्स्चेंजचा कार्यक्रम होता, तेव्हा क्लिंटन यांच्याशी गडकरींचं बोलणं करुन दिलं आणि सांगितलं की, त्यांनी मुंबईचं एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे.