देशातील श्रीमंत वस्तीत पाणी नाही, उद्योगपती टाटांसह अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाज यांना त्रास

 देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या कफ परेड भागात पाण्याची टंचाई दिसून येत आहे.

Updated: Oct 12, 2018, 06:28 PM IST
देशातील श्रीमंत वस्तीत पाणी नाही, उद्योगपती टाटांसह अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाज यांना त्रास title=

मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या कफ परेड भागात पाण्याची टंचाई दिसून येत आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाज यांच्यासह अनेक उद्योगपतींच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे पाणी आलेच नाही. त्यामुळे त्यांना पाण्याशिवाय दिवस काढावे लागलेत. 

मुंबईतल्या सर्वात उच्चभ्रु, श्रीमंत वस्तीत कफ परेड, कुलाबा, फोर्ट या ठिकाणी गेले तीन दिवस पाणी नाही. या भागात मोठ्या उद्योगपतींसह मोठे प्रशासकिय अधिकारी, बँकांचे अधिकारी यांच्याही रहिवासी इमारती इथेच आहेत. या ठिकाणीही महापालिकेच्या पाईपलाईननं पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी त्यांचे हाल होत आहेत.

गेले दोन महिने 30-40 टक्केच पाणीपुरवठा होत आहे. कुलाबा, कफ परेडमध्ये टँकरनं पाणी भरण्याची वेळ आली आहे. दरम्यान, टँकरमाफिया आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या संगनमतानं कृत्रीम पाणीटंचाई निर्माण केली जातेय, असा आरोप एका नगरसेवकाने केलाय.

या ठिकाणी मेट्रोच्या तीन स्टेशन्सचं काम सुरु आहे. मेट्रोला पाणी वळवण्यात येते आहे, असाही इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. कफ परेडमध्ये राहणारे भाजप नगरसेवक मिलिंद नार्वेकर यांच्याच घरी पाणी नसल्याने त्यांनाही तोंड द्यावे लागले आहे.