काँग्रेस नेते पतंगराव कदम यांंचे निधन

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  

Updated: Mar 9, 2018, 11:42 PM IST
काँग्रेस नेते पतंगराव कदम यांंचे निधन   title=

मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते  आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज  अखेर त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली आहे. 

प्रदीर्घ आजाराने निधन  

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून पतंगरावांवर लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, पतंगरावांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सकाळी लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचा चांगला नेता हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

बालपण आणि शिक्षण

सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगरावांचा जन्म झाला होता. 

कार्य

डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे संस्थापक असून ते याचे संस्थापक-कुलगुरु देखील आहेत. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे याच्या छत्राखाली देश व परदेशामध्ये 180 शैक्षणिक संस्था असून ही भारतातील नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात.

डॉ. कदम सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक आहेत.नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि Computer Application यांची महाविद्यालये स्थापन केली आहेत.

पुरस्कार....

पतंगरावांच्या  सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूशण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार” हे होत.