अकोल्यात काम करायला अधिकारीच नाहीत!

अकोला जिल्हा परिषद आणि महापालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था राज्यात आपल्या बेभरवशाच्या कारभारानं प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या बेभरवशी कामकाजासाठी प्रसिद्ध असणा-या या दोन्ही संस्थांचा कारभार रामभरोसे चाललाय की काय? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.

Updated: Aug 9, 2012, 08:18 AM IST

www.24taas.com, अकोला

 

अकोला जिल्हा परिषद आणि महापालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था राज्यात आपल्या बेभरवशाच्या कारभारानं प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या बेभरवशी कामकाजासाठी प्रसिद्ध असणा-या या दोन्ही संस्थांचा कारभार रामभरोसे चाललाय की काय? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.

 

अकोला जिल्हा परिषद आणि महापालिका... अकोल्यातील सर्वसामान्यांच्या आकांक्षांचं प्रतीक असणा-या या दोन्ही स्वराज्य संस्था.... मात्र या दोन्ही संस्था आपल्या वादग्रस्त कारभारामुळे पुरत्या बदनाम झाल्या आहेत. सध्या अकोल्यातील या दोन्ही स्वराज्य संस्थांवर प्रकाश आंबेडकरांच्या भा.रि.प.- बहूजन महासंघाचा झेंडा आहे.मात्र या दोन्ही ठिकाणी आपल्या कामासाठी येणारी सर्वसामान्य जनता सध्या पुरती सैरभैर झाली आहे. कारण काय तर या याठिकाणी काम करायला अधिकारीच नाही. अकोला जिल्हा परिषदेत थोडे-थोडके एक-दोन नव्हे तर वर्ग एक आणि दोनची तब्बल २८ पदं रिक्त आहेत. महापालिकेतदेखील याहून वेगळी परिस्थिती नाही.जिल्हा परिषद आणि महापालिकेत अधिकारी आणण्याचं सामर्थ्य ना इथल्या सत्ताधा-यांमध्ये आहे ना विरोधकांमध्ये...मात्र या प्रश्नावरून त्यांच्यामध्ये राजकीय टोलवा-टोलवीला चांगलाच बहर आलाय.

 

अकोल्यातल्या राजकीय वातावरणामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेत काम करायला चांगले अधिकारी तयारच होत नाहीत. त्यामुळे इथल्या अधिका-यांची वा न वा दूर करण्यासाठी प्रयत्न करतांनाच जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी आता या बाबींवर गांभीर्यानं आत्मचिंतन करणं गरजेचं झालंय.