जगनमोहन रेड्डीः सीम्रांध्राचा डिसायडिंग फॅक्टर

जगन मोहन रेड्डी यांना सीमांध्रमधून जोरदार पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. सीम्रांध्र मधील ख्रिश्चन, अल्पसंख्याक जगन मोहन रेड्डीच्या पारड्यात मतं टाकतील असं म्हटलं जातं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 05:39 PM IST

जगन मोहन रेड्डी यांना सीमांध्रमधून जोरदार पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. सीम्रांध्र मधील ख्रिश्चन, अल्पसंख्याक जगन मोहन रेड्डीच्या पारड्यात मतं टाकतील असं म्हटलं जातं.
युनायटेड आंध्रा ही त्यांची भूमिका आहे, त्यांना सीम्रांध्रचा मध्यम वर्गही मतदान करेल, असं सांगण्यात येतंय.
वायएस आर काँग्रेस हा पक्ष काँग्रेससाठी किती डोकेदुखी ठरेल हे निवडणुकीनंतरच ठरणार आहे. तसेच आंध्रच्या विधानसभा निवडणुकाही तोंडाशी आलेल्या आहेत. यात जगनमोहन यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होते किंवा नाही, ते दिसून येणार आहे.
जगनमोहन आणि काँग्रेस
लहान मोठे व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या वायएस जगनमोहन रेड्डी यांची राजकारणातली सुरूवात चांगली झाली मात्र, पायात पाय अडकवल्यासारखं त्यांचा प्रवास मध्येच थांबला आणि त्यांना काही महिने सीबीआयच्या कोठडीत काढावे लागले.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचा एकुलता एक मुलगा जगन मोहन रेड्डी. जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या बिझनेस करिअरला 1999-2000मध्ये सुरूवात केली.
आपल्या उद्योगाला सुरूवात त्यांनी कर्नाटकमधील संदूरमधून केली, त्यांनी एक छोटी पावर कंपनी सुरू केली. यानंतर त्यांनी या कंपनीचा विस्तार पूर्वोत्तर राज्यांमध्ये केला.
जगनमोहन रेड्डी यांचे वडिल वायएस राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा बिझनस ग्राफ प्रचंड वेगाने वाढला. यानंतर जगन मोहन यांनी इतर क्षेत्रात गुंतवणुकीला सुरूवात केली. यात सिमेंट प्लांट आणि मीडिया क्षेत्राचाही समावेश होता.
चाळीस वर्षीय जगन मोहन यांची राजकीय महत्वाकांक्षा पहिल्यांदा 2004 मध्ये दिसू आली, जेव्हा त्यांनी कडप्पा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र काँग्रेस हायकमांडने त्यांच्या मागणीला नकार दिला.
आपलं राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना 2009 पर्यंत वाट पहावी लागली. जगनमोहन यांनी कडप्पा लोकसभा सीट जिंकून राजकारणात प्रवेश केला.
मात्र त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये जगनमोहन रेड्डी यांचे वडिल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.
वडिलांच्या मृत्यूनंतर जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी सर्व काही बदललं. आपल्या वडिलांच्या जागी जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशाचं मुख्यमंत्री व्हायचं होतं, मात्र काही आमदारांच्या नकार घंटेमुळे काँग्रेस हायकमांडने जगनमोहन रेड्डी यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही.
हळू-हळू जगन मोहनरेड्डी यांचा काँग्रेसविषयीचा दृष्टीकोन बदलला आणि जगनमोहन रेड्डींनी काँग्रेस नेतृत्वाकडे दुर्लक्ष करून वेगळी वाट निवडली.
सत्ताधारी पक्षापासून वेगळं होऊन जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या राजकीय करियरला सुरूवात केली, त्यांनी ओडारपू यात्रा केली, काही गावं आणि जिल्ह्यांची यात्रा केली.
राज्यात जगन मोहन रेड्डी यांची लोकप्रियता वेगाने वाढत होती. काँग्रेसने त्यांच्या या यात्रेवर आक्षेप घेतला आणि यानंतर जगनमोहन यांनी काँग्रेसला मात्र सोडचिठ्ठी दिली. काँग्रेस पक्ष आणि जगनमोहन यांच्यातील संघर्ष 2010 मध्ये अधिक तीव्र झाला, जेव्हा काँग्रेसने रोसैय्या यांच्या जागी एन किरण कुमार रेड्डी यांना राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलं.
अखेर 29 नोव्हेंबर 2010 मध्ये जगनमोहन रेड्डी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि खासदाराकीचाही राजीनामा दिला.
मार्च 2011 मध्ये जगनमोहन रेड्डी यांनी वायएसआर कांग्रेस आघाडीची घोषणा केली.
मे 2011 मध्ये झालेल्या कडप्पा पोटनिवडणुकीत जगनमोहन रेड्डी हे रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून आले. तसेच त्यांची आई वायएस विजया या देखिल पुलिवेन्दुला विधानसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या.
यानंतर राज्यातलं काँग्रेस सरकार पाडण्यासाठी 16 आमदारांनी बंड केलं मात्र, प्रजा राज्यम आणि काही पक्षांनी मिळून हे सरकार वाचवण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. यानंतर जगनमोहन रेड्डी यांच्यावर काही आयपेक्षा जास्त संपत्ती ठेवण्याचे आरोप लागले. यानंतर त्यांना काही महिन्यांनी जामीन मिळाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.