कसाबचा प्रवास... पन्नास करोड ते पन्नास रुपये

अजमल कसाब याला जेलमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारनं पन्नास करोड रुपयांचा खर्च केला होता. पण, महत्त्वाची बाब म्हणजे याच कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी लागलेत अवघे ५० रुपये...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 21, 2012, 06:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अजमल कसाब याला जेलमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारनं पन्नास करोड रुपयांचा खर्च केला होता. पण, महत्त्वाची बाब म्हणजे याच कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी लागलेत अवघे ५० रुपये... हे आम्ही नाही तर भारताचा कायदा म्हणतोय.
भारताच्या कायद्यानुसार कोणत्याही अपराध्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी केवळ ५० रुपये खर्च केले जाऊ शकतात. कोणत्याही दोषी व्यक्तीला फाशी देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या जल्लादालाही यापेक्षा वेगळी रक्कम दिली जात नाही. भारताच्या नियमानुसार तुरुंग अधिक्षक एका अपराध्याचा मृतदेह घेऊन जाणं तसंच त्यावर अंत्यसंस्कार करणं यासाठी केवळ ५० रुपये खर्च करू शकतो.
बुधवारी सकाळी २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी मोहम्मद अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्यात आलीय. त्यानंतर पुण्यातील येरवडा तुरूंगात कसाबला दफन करण्यात आलं आहे, अशी माहिती महराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. याचबरोबर कसाबने मृत्यूपत्र केलेले नाही. कायद्याची अंमलबजावणी करून कसाबला फाशी दिली, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दफनविधीच्या वेळीही नियम काटेकोरपणे पाळले गेले असतील तर हा खर्च निश्चितच ५० रुपयांपेक्षा जास्त जाणार नाही.