निचरा पैशाचा की कचऱ्याचा...

मुंबई महापालिकेनं राबवलेल्या ‘ब्रिमस्टोवॅट’ प्रकल्पाचा खर्च कसा वाढला याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलंय.

Updated: Jul 17, 2012, 10:28 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिकेनं राबवलेल्या ‘ब्रिमस्टोवॅट’ प्रकल्पाचा खर्च कसा वाढला याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलंय.

 

या प्रकल्पाचा खर्च १२०० कोटींवरुन आता ३५३५ कोटींपर्यंत पोहचलाय. २००५ मध्ये सुधारणा करण्यात आलेला हा प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. प्रकल्प का रखडला याची चौकशी करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलय. या प्रकल्पाचे कंत्राट कुणाला दिले, टेंडर कशी काढली याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

 

दक्षिण मुंबईत पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येतोय. १९९३ साली सादर झालेला हा प्रकल्पब गेल्या १८ वर्षांपासून रखडलेला आहे. १९९३ साली त्याची किंमत ६१६ कोटी रुपये होती. त्यापैंकी २६० कोटींची कामं सन २००४-०५ पर्यंत पूर्ण झाली. पण, २६ जुलै २००५च्या मुंबईतल्या महापुरानंतर या प्रकल्पात काही सुधारणा सुचवण्यात आल्या. त्यानुसार १२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला केंद्रानं मंजुरी दिलीय. तसंच या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आत्तापर्यंत महापालिकेलात एक हजार कोटी रुपयेही मिळाले आहेत. पण, अजूनही हा प्रकल्प मात्र मार्गी लागला नाही. २०१५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलीय. त्यामुळे पुढचे तीन वर्ष तरी हा प्रकल्प पूर्ण होण्याची चिन्हं नाहीत.

 

.