मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू

टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 21, 2014, 09:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.
रात्री साडेअकराच्या सुमाराला मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅकवर घसरलेली गाडी काढण्याचं काम तब्बल १४ तास सलग सुरू होतं. मध्य रेल्वेने मुंबईकडे येणारी वाहतूकही सुरळीत सुरू केली आहे. 
ट्रेनचे डबे घसरून झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार झालाय तर नऊ जण जखमी झालेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मृत व्यक्तीचं नाव धवल लोढाया असून तो घाटकोपरचा रहिवासी आहे.
मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत रेल्वेने जाहीर केलीय तर गंभीर जखमींना १५ हजार रुपये तर इतर जखमींना ५ हजार रुपये मदत जाहीर केलीय.
कसाऱ्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या या लोकलला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी अपघात झाला. या अपघातामध्ये लोकल ट्रेनचे शेवटच्या बाजूचे पाच डबे घसरले. या अपघातात ट्रॅकचेही मोठे नुकसान झालं होतं. या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणावरुन कल्याण-टिटवाळा दरम्यानची दोन्ही मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक रेल्वेने बंद केली होती. मात्र, आता दोन्ही मार्गांवरची वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.