नव्या वर्षापासून रेल्वे प्रवास भाडे महागणार

नवा वर्षाची सुरवात ही महागाईने होणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचं प्रवास भाडे वाढणार आहे.

Updated: Dec 21, 2012, 09:53 AM IST

www.24tasa.com, मुंबई
नवा वर्षाची सुरवात ही महागाईने होणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचं प्रवास भाडे वाढणार आहे. रेल्वे प्रवासासाठी अधिभार आकारण्याच्या राज्य सरकार आणि रेल्वेच्या भूमिकेमुळे नव्या वर्षापासून लोकलचा प्रवास महाग होणार आहे.
दुसर्‍या वर्गाची तिकीट दोन तर पहिल्या वर्गाची तिकीट चार रुपयांनी वाढणार असून दुसर्‍या वर्गाचा मासिक पास २० रुपयांनी व पहिल्या वर्गाचा मासिक पास ४० रुपयांनी वाढणार आहे. या अधिभाराचा भुर्दंड उपनगरी लोकलने प्रवास करणार्‍या सुमारे ७५ लाख प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने त्यास मंजुरी दिल्याने १ जानेवारी २०१३ पासून प्रवाशांवर अधिभार लादला जाणार आहे. अधिभारातून मिळणार्‍या रकमेतून अर्धा वाटा राज्य सरकारला मिळणार आहे. मात्र, पहिल्या १० किमीसाठी कोणताही अधिभार लावणार नसल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.