१६ फेब्रुवारीला महापालिकांचे रणसंग्राम!

राज्यातील १० महापालिका निवडणुका येत्या १६ फेब्रुवारी तर २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी दिली.

Updated: Jan 3, 2012, 07:15 PM IST

www.24taass.com, मुंबई

 

राज्यातील १० महापालिका निवडणुका येत्या १६ फेब्रुवारी तर  २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी दिली.

 

आयुक्तांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर आजपासूनच राज्यात  आचारसंहिता लागू झाली आहे. मिनी विधानसभा अशी या निवडणुका असे या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.

 

मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावती या ठिकाणी येत्या १६ फेब्रवारी रोजी मतदान होणार असून यातील काही महापालिकांची मतदान मोजणी १६ तारखांनाच होणार असून इतर महापालिकाची मतमोजणी १७ तारखेला होणार आहे.

 

संबंधीत महापालिकांच्या आयुक्तांनी व्यवस्था केल्यावर मतमोजणी १६ तारखेला होऊन त्याच दिवशी निकाल लागणार आहे. या पूर्वी नंदुरबार नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन मतदानाच्या दिवशी निकाल जाहीर केला होता. हा उपक्रम यशस्वी झाल्याचेही नीला सत्यनारायणन यांनी सांगितले. यंदा मतदानाची तारीख गुरूवारी येणार आहे. सुट्टीच्या दिवशी अनेक नागरिक बाहेरगावी जातात आणि त्यामुळे मतदानाचे प्रमाण घटते. मतदान वाढावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

महापालिका निवडणूक आधी घेऊन थोड्या अंतराने जिल्हा परिषद निवडणूक व्हावी,  असे सरकारला वाटत होते. महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास या दोन्ही निवडणुकांच्या प्रचाराशी संबंध येणाऱ्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागेल ही भीती सरकारला वाटत असल्याने ही विनंती करण्यात आली आहे.  तर अगोदर जिल्हा परिषद निवडणूक घेऊन नंतर महापालिका निवडणूक अथवा दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा आयोगाचा आग्रह होता. महापालिका क्षेत्रातील मतदारांना खूष करणारे निर्णय झाले. मात्र जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील मतदारांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. अन्यथा नगरपालिका निवडणुकीप्रमाणे फटका बसेल, अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा आणि निवडणुका या एकाच कालावधीत येत असल्याने दर पाच वर्षांनी या संदर्भात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे परीक्षांपूर्वी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत निवडणुका संपवता येतील का हे पाहावे लागेल,  अर्थात या बाबतचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगच घेईल , असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले होते. दहावी-बारावी परीक्षा आणि निवडणुका या दर पाच वर्षांनंतर एकत्र येतात. मागील वेळी परीक्षांच्या आधी महापालिका तर नंतर जिल्हा परिषदा निवडणुका झाल्या होत्या. आत्ताही परीक्षा पुढे ढकलण्यास शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला होता.

राज्यातील १० महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोला

मतदान तारीख : १६ फेबुवारी,

मतमोजणी : १६ आणि १७ फेब्रुवारी,

अर्ज भरायला सुरूवात : २४ जानेवारी

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : ३१ जानेवारी

अर्जाची छाननी : ०१ फेब्रुवारी

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : ३ फेब्रुवारी

चिन्हांचं वाटपः  ४ फेब्रुवारी आणि अंतिम यादी

.............

राज्यातील २७ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम

मतदानाची तारीखः ७ फेब्रुवारी

मतदानाची वेळ : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०,

मतमोजणी : ८ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून

अर्ज भरायला सुरूवात : १८ जानेवारी,

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : २३ जानेवारी

अर्जाची छाननी : २४ जानेवारी

 हरकतींची तारीखः  २७ जानेवारीपर्यंत

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : ३० जानेवारी

चिन्हाचं वाटप : ३० जानेवारी