अल्पवयीन मुलींची विक्री करणारी टोळी अटकेत

चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीबहुल इंदिरानगर भागातून २०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात ५ मुली एकापाठोपाठ बेपत्ता झाल्या होत्या.

Updated: Feb 21, 2013, 09:46 AM IST

www.24taas.com, आशिष अंबाडे, चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीबहुल इंदिरानगर भागातून २०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात ५ मुली एकापाठोपाठ बेपत्ता झाल्या होत्या. अनेक दिवसांपासून मुलींचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र पोलिसांनी चिकाटीने तपास करत यामागचं गूढ उकललं. या मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
चंद्रपूर शहरातील झोपडपट्टी बहुल इंदिरानगर परिसरातून फेब्रुवारी २०१२ मध्ये एकामागून एक अशा पाच मुली बेपत्ता झाल्या मात्र तपास काही लागत नव्हता. मुलींच्या या बेपत्ता होण्यामागे षडयंत्र असल्याचं समोर आलं. मध्य प्रदेशातल्या मुलाशी लग्न लावून दिलेल्या एका मराठी मुलीच्या चौकशीतून यामागे दलालांची टोळी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
राजस्थान-मध्यप्रदेश सीमेलगतच्या गावात ३० ते ५० हजार रुपयांमध्ये या मुलींची विक्री करण्यात आली. यामध्ये अल्पवयीन मुलींची लग्नं लावून देण्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. आर्थिकदृष्टया गरीब घरातल्या मुलींवर नजर ठेवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न या दलालांमार्फत केला जातो. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करत पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केलाय.