हिवरेबाजाराला आता `मुलीं`च्या भविष्याची चिंता नाही!

स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न मोठ्या प्रकर्षानं गाजत असताना... अनेक ठिकाणी कचऱ्यात, नाल्यात स्त्री अर्भकं सापडत असताना हिवरेबाजार या गावानं लोकांसमोर एक नवीन आदर्श प्रस्थापित केलाय...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 29, 2013, 12:03 PM IST

www.24taas.com, हिवरेबाजार
स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न मोठ्या प्रकर्षानं गाजत असताना... अनेक ठिकाणी कचऱ्यात, नाल्यात स्त्री अर्भकं सापडत असताना हिवरेबाजार या गावानं लोकांसमोर एक नवीन आदर्श प्रस्थापित केलाय. ‘दुसरी मुलगीही धनाची पेटी’ अशी निव्वळ घोषणा न करता या गावानं या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी ठोस पावलंदेखील उचलली आहेत.
दुसरीही मुलगी झाल्यास तिच्या विवाहाचा खर्च ग्रामनिधीतून करण्याचा निर्णय हिवरेबाजारच्या ग्रामसभेत घेण्यात आलाय. तसंच मुलगी व तिच्या आईच्या नावावर पाच हजार रूपये कायम ठेव ठेवली जाईल. मुलगी सज्ञान झाल्यानंतर म्हणजे अठरा वर्षाची झाल्यानंतर त्या रकमेचे व्याज व रक्कम तिच्या लग्नासाठी वापरण्यात येणार आहे. लग्नाचा सर्व खर्च ‘ग्रामस्थ सामूहिक विवाह सोहळ्या’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ग्रामसभेसाठी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सरपंच सुनीता पवार यांच्यासोबतच स्कॉटलंडच्या ‘फियानो क्लार्क’ या समाजसेवी कार्यकर्त्यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मुलींना स्वसंरक्षासाठी तयार करण्यावरदेखील विचारविनमय करून मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी प्रशिक्षकाची नियुक्तीदेखील लवकरच करण्यात येईल.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, यावर्षीचा राज्यातील मुलींचा जन्मदर एक हजार मागे ८७५ तर हिवरेबाजारचा मुलींचा जन्मदर १४२८ असा आहे.