'आम्हाला वाटलं होतं की...', कोहलीच्या अनुपस्थितीवर रोहित शर्माने अखेर मौन सोडलं; 'एक्स्पोज होण्यापेक्षा...'

भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान पहिल्या सामन्याच्या आधी कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.   

शिवराज यादव | Updated: Jan 24, 2024, 03:04 PM IST
'आम्हाला वाटलं होतं की...', कोहलीच्या अनुपस्थितीवर रोहित शर्माने अखेर मौन सोडलं; 'एक्स्पोज होण्यापेक्षा...' title=

भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने इंग्लंडला भारताला त्यांच्यात मायभूमीत पराभवाची धूळ चाखण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नाही आहे. वैयक्तिक कारणास्तव आपल्याला पहिल्या दोन सामन्यांमधून वगळण्याची विनंती त्याने बीसीसीआयकडे केली होती. त्यानुसार त्याला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या सामन्याच्या आधी कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कोणत्या खेळाडूला संधी द्यावी यासंबंधी मत मांडलं. 

पाहुण्या संघाने भारतात मालिका जिंकून 12 वर्षं झाली आहेत. 2012 मध्ये इंग्लंड संघानेच ही कामगिरी केली होती. त्या मालिकेतील तीन खेळाडू फलंदाज जॉनी बेअरस्टो, जो रूट आणि वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्याच्या इंग्लंड संघाचा भाग आहेत. त्यातच इंग्लंड संघ सध्या बेजबॉल पद्धतीने खेळत असून, भारतीय संघासमोर त्यांना रोखण्याचं आवाहन आहे. 

कसोटी मालिकेत भारताचा हुकमी एक्का विराट कोहली खेळणार नसून, संघाला त्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. विराट कोहली संघासह हैदराबादमध्ये पोहोचला होता, पण काही कारणास्तव तो माघारी परतला. यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी कोणत्या खेळाडूची निवड होणार यासंबंधी वेगवेगळे तर्क लावले जात होते. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, बी साई सुदर्शन, सरफराज खान आणि रजत पाटीदार यांची नावं चर्चेत होती. अखेर रजत पाटीदारच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

रजत पाटीदारला संधी देण्यासंबंधी रोहित शर्माने भाष्य केलं आहे. पत्रकार परिषदेत त्याने यामागील हेतू स्पष्ट करताना सांगितलं की, "आम्ही विराट कोहलीच्या अनुपस्थितीत एखाद्या अनुभवी खेळाडूला संघाला संधी देण्याचा विचार केला. जर तरुण खेळाडूला संधी दिली तर थेट परदेशातील स्थितीत ते उघडे पडू नयेत अशी आशा असते". "अनेकदा तेथील स्थितीची जाणीव असणाऱ्या काही खेळाडूंना संघात स्थान द्यावं लागतं," असंही ते म्हणाले.

रजत पाटीदारने डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केलं होतं. उद्या तो आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे. प्रथम श्रेणीत 46 च्या सरासरीने त्याने 4000 धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बसिरला भारतात येता न आल्याबद्दल विचारण्यात आलं असता रोहित म्हणाला की, "मला त्याच्यासाठी वाईट वाटत आहे. अशा प्रकारची स्थिती कोणासाठीही सोपी नसते. दुर्दैवाने मी व्हिसा कार्यालयात बसत नाही, ज्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती देऊ शकत नाही. तो लवकर येईल अशी आशा आहे".