IPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरण

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पडतोय. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 55 सामन्यांनंतरही प्ले ऑफमधले संघ निश्चित झालेले नाहीत. आतापर्यंत एकही संघ प्लेऑफमध्ये क्वालीफाय झालेली नाही.

राजीव कासले | Updated: May 7, 2024, 04:21 PM IST
 IPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरण title=

IPL 2024 Playoff all teams scenario: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत दहा संघात 55 सामने खेळवण्यात आले आहेत. पण विशेष म्हणजे दहा पैकी एकही संघ अद्याप प्ले ऑफमध्ये  (Play Off) प्रवेश करु शकलेला नाही. अजून 15 सामने खेळायचे बाकी आहेत. मुंबई इंडियन्स  (Mumbai Indians) वगळता उर्वरीत 9 संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) प्रत्येकी 16 अंकांसह पॉईंटटेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. 

आयपीएल प्ले ऑफचं समीकरण
कोलकता नाइटरायडर्स -  श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईटरायडर्स संघ आतापर्यंत 11 सामने खेळला आहे. यात 8 सामन्यात विजय तर 3 सामन्यात पराभव स्विकारला असून केकेआरच्या खात्यात 16 पॉईंट जमा आहेत. केकेआर अद्याप तीन सामने खेळायचा बाकी आहे. एका विजयाने कोलकातना नाईट रायडर्सचं प्ले ऑफमधलं स्थान निश्चित होणार आहे. सध्या कोलकाता पॉईंटटेबलमध्ये टॉपवर आहे.

राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. कोलकाताबरोबरच राजस्थानच्या खात्यातही 16 अंक जमा आहेत. राजस्थानने 10 सामन्यांपैकी 8 सामन्यात विजय तर 2 सामन्यात पराभव स्विकारावा लागलाय. राजस्थानचे चार सामने बाकी आहेत. राजस्थान सध्या दुसऱ्या स्थानावर असून एका विजयाने राजस्थान प्ले ऑफमध्ये एन्ट्री करेल.

चेन्नई सुपर किंग्स - चेन्नई सुपर किंग्स पॉईंटटेबलमध्ये 12 अंकासह तिसऱ्य् क्रमांकावर आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने आतापर्यंत 11 सामने खेळले असून यात 6 सामन्यात विजय तर 5 सामन्या पराभव पत्करावा लगालेला आहे. प्ले ऑफमध्ये जागा पटकावयची असेल तर चेन्नईला तीन पैकी 2 सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे किंवा तीनही सामने जिंकावे लागणार आहेत. 

सनराइजर्स हैदराबाद - पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा सनरायजर्स हैदराबादचा संघ 12 अंकांसह पॉईंटटेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. एसआरएचचे आतापर्यंत 11 सामने झालेत. यात सहा सामन्यात विजय मिळवलाय. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. उर्वरीत तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात हैदराबादला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. 

लखनऊ सुपर जायंट्स - आयपीएलचा तिसरा हंगाम खेळणारा लखनऊ सुपर जायंटसचा संघ पॉईंटटेबलमधअये पाचव्या क्रमांकावर आहे. लखनऊच्या खात्यात 6 विजय आणि 5 पराभवासह 12 पॉईंट जमा आहेत. हैदराबादचा रनरेट 0.371 इतका आहे. प्ले ऑफमध्ये धडक मारण्यासाठी उर्वरित  तीन पैकी 2 सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे किंवा तीनही सामने जिंकावे लागणार आहेत. 

दिल्ली कॅपिटल्स - ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने 11 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय तर 6 सामन्यात पराभव स्विकारला आहे. दिल्लीच्या खात्यात 10 अंक जमा असून प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला उर्वरीत तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आतापर्यंत 11 सामने खेळलाय. यात चार सामन्यात बंगळुरुने विजय मिळवलाय. त्यांच्या खात्यात 8 पॉईंट जमा आहेत. सातव्या क्रमांकावर असलेल्या बंगळुरुला उर्वरीत तीनही सामने जिंकावे लागणार आहेत. पण जिंकण्याबरोबरच नेट रनरेटकडेही लक्ष ठेवावं लागणार आहे. शिवाय इतर संघांच्या निकालावर त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे. 

पंजाब किंग्स - पंजाब किंग्सने आतापर्यंत 11 सामने खेळलेत. यात सात सामन्यात पराभव तर 4 सामन्यात विजय मिळवलाय. पंजाबचा नेट रनरेटही -0.187 इतका असून पॉईंटटेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफमध्ये धडक मारायची असेल तर पंजाबला पुढचे तीनही सामने चांगला रनरेट राखून जिंकावे लागणार आहेत. शिवाय इतर संघांच्या निकालावर त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे. 

गुजरात टायटन्स - शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ पॉईंटटेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. पण गुजरातही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. गुजरातच्या खात्यात 8 पॉईंट आहेत. पुढचे तीनही सामने चांगल्या रनरेटने जिंकले तर गुजरातला टॉप फोरमध्ये एन्ट्री मिळू शकते.

मुंबई इंडियन्स - मुंबई इंडियन्स यंदा पहिल्यांदाच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये उतरलीय. पण प्ले ऑफच्या शर्यतीतून मुंबई जवळपास बाहेर पडलीय. मुंबईचे आतापर्यंत 12 सामने झालेत. यापैकी केवळ चार सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर आठ सामन्यात पराभव झालाय. मुंबईच्या खात्यात 8 अंक जमा आहेत. पुढचे दोन्ही सामने जिंकले तरी मुंबईच्या खात्यात 12 अंक होतात. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके अंक पुरेसे नाहीत.