IPL 2024 मध्ये RCB चं भविष्य काय? कोहलीच्या संघासमोर 'ही' विराट समस्या; फलंदाजी उत्तम पण..

IPL 2024 RCB Playing XI:  दरवेळेस दमदार वाटणारा मात्र एकदाही जेतेपदावर नाव न कोरता आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा यंदाचा संघ नेमका कसा आहे? त्यांच्या संघातील सकारात्मक, नकारात्मक पॉइण्ट्स कोणते आहेत यावर टाकलेली ही नजर...

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 22, 2024, 01:09 PM IST
IPL 2024 मध्ये RCB चं भविष्य काय? कोहलीच्या संघासमोर 'ही' विराट समस्या; फलंदाजी उत्तम पण..  title=
बंगळुरुच्या संघासमोर काही मोठे प्रश्न आहेत

IPL 2024 RCB Playing XI : इंडियन प्रीमिअर लीगच्या 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. चेन्नईमधील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्याच सामन्यात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा संघ गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK vs RCB) मैदानात उतरणार आहे. यंदाच्या महिला आयपीएलमध्ये बंगळुरुच्या संघाने जेतेपदावर नाव कोरल्याने पुरुषांच्या संघालाही हा चमत्कार करता येणार का याकडे सर्वच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र बंगळुरुचा यंदाचा संघ नेमका कसा आहे? त्यांच्या संघातील सकारात्मक, नकारात्मक पॉइण्ट्स कोणते आहेत यावर टाकलेली ही नजर...

फलंदाजी हा संघाचा कणा

आरबीसीचा संघ फलंदाजीमध्ये स्पर्धेतील अन्य अनेक संघापेक्षा सरस दिसत आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिसबरोबरच विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल हे तिघेजण एकट्याच्या जोरावर सामन्याचं पारडं आपल्या बाजूने झुकवण्याचं सामर्थ्य ठेवतात. अव्वल पाचचा विचार केल्यास रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन हे दोघेही कोणत्याही गोलंदाजांसमोर तग धरुन टिचून फलंदाजी करु शकतात. रजत पाटीदार हा गोलंदाजांवर तुटून पडल्याचं यापूर्वी अनेकदा पाहायला मिळालं आहे.

सर्वात मोठी कमतरता

आरसीबीची सर्वात मोठी लंगडी बाजू म्हणजे त्यांची गोलंदाजी आहे. मोहम्मद सिराजने 2023 च्या आयपीएलमध्ये दखलपात्र कामगिरी केली होती. मात्र त्याच्या कामगिरीत सातत्याचा आभाव जाणवतो. अन्य वेगवान गोलंदाजांमध्ये अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसनचा समावेश असून त्यांच्यामध्येही सातत्याचा आभाव ही मोठी समस्या आहे. फिरकी गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास वानिंदू हसरंगाने स्पर्धेतून माघार घेतली आहे त्यामुळे करण शर्मा हा एकमेव फिरकीपटू शिल्लक राहिला आहे. संघाला ग्लेन मॅक्सवेल, विली जॅख्स आणि महिपाल लोमरोर या पार्ट टाइम स्पीनर्सवर अवलंबून रहावं लागणरा आहे. मात्र यातही एकाच वेळेस 4 परदेशी खेळाडू खेळवण्याचा नियम अडथळा ठरु शकतो.

नक्की वाचा >> 'मला फार चिंता करण्याची गरज नाही कारण...'; CSK चा कॅप्टन झाल्यानंतर ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया

बदललेल्या नियमाचा होणार फायदा

यंदाच्या पर्वामध्ये बदललेल्या नियमानुसार एका ओव्हरमध्ये 2 बाऊन्सर टाकण्याची संधी असल्याने याचा फायदा आरसीबीच्या उंच गोलंदाजांना घेता येईल. अल्झारी जोसेफ, रीस टोपले तसेच मोहम्मद सिराज यांना या गोष्टीचा फायदा होईल. यामुळे वेगाने विकेट्स घेण्याची संधी या गोलंदाजांना आहे

आरसीबीसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब

सलामीवीरांच्या कामगिरीवर बंगळुरुला फार मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागणार आहे. ही संघासाठी धोकादायक बाब आहे. पूर्वी ख्रिस गेल आणि आता फाफ डू प्लेसिस तसेच विराट कोहलीच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. त्याशिवाय दिनेश कार्तिकची सुमार कामगिरी सुद्धा संघासाठी चिंतेची बाब आहे. कार्तिकने मागील पर्वात केवळ 140 धावा केल्या होत्या. विराट, ए. बी. डिव्हिलिअर्स, ख्रिस गेल आणि अनिल कुंबळेंसारखे दिग्गज या संघातून खेळले असले तरी त्यांना एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही.

नक्की वाचा >> धोनीने CSK चं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितची Insta स्टोरी चर्चेत; पोस्ट पाहून चाहते भावूक

आरसीबीच्या संघात कोण कोण?

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.