पाकिस्तानसाठी १७० धावांचे आव्हान सोपे नाही हे आधीपासूनच माहीत होते - मिताली

भारतीय संघाने महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला तब्बल ९५ धावांनी पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानसमोर भारताने विजयासाठी १७० धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय संघाच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ ७४ धावांवर गारद झाला. 

Updated: Jul 3, 2017, 04:23 PM IST
पाकिस्तानसाठी १७० धावांचे आव्हान सोपे नाही हे आधीपासूनच माहीत होते - मिताली title=

डर्बी : भारतीय संघाने महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला तब्बल ९५ धावांनी पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानसमोर भारताने विजयासाठी १७० धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय संघाच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ ७४ धावांवर गारद झाला. 

या विजयानंतर भारताची कर्णधार मिताली राज म्हणाली, मला माहीत होते की पाकिस्तानी संधासाी १७० धावांचे आव्हान पार करणे सोपे नसणार कारण या सामन्यात दुसऱ्या डावात खेळपट्टी ही फलंदाजीसाठी तितकीशी अनुकूल असणार नाही. यावनेळी तिने खालच्या क्रमांकावर येत चांगली फलंदाजी केल्याबद्दल सुषमा वर्मा आणि झूलन गोस्वामी यांचेही कौतुक केले. 

जेव्हा तुम्ही पहिल्या १० षटकांत पहिली विकेट गमावता तेव्हा तुम्ही बॅकफूटवर जाता. आम्ही सुरुवातीला चांगली भागीदारी केली. मात्र दोन विकेट झटपट गमावल्याने बॅकफूटवर गेलो. मी फलंदाजांना ४० व्या षटकापर्यंत टिकून राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतरही आम्ही एकामागोमाग एक विकेट गमावल्या. सुषमा आणि झूलन यांनी खेळपट्टीवर काही काळ टिकून राहत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

मिताली पुढे म्हणाली, जेव्हा आम्ही १७० धावांचे आव्हान ठेवले तेव्हाच कळले होते की सुरुवातीला विकेट घेणे गरजेचे असते. कारण आव्हानाचा पाठलाग करणारी टीम कितीही चांगली असो भले त्यांच्यासमोर १५० धावांचे आव्हान असो चांगल्या सुरुवातीसाठी त्यांच्यावरही दबाव असतो. स्पिनर्सनी चांगली कामगिरी केली.