Virat Kohli : "मला सांगताना अजिबात लाज वाटत नाही की..."; IPL सुरु असतानाच विराटचं मोठं विधान

Virat Kohli Talks About His Mistakes: विराट कोहली कर्णधार असताना भारतीय संघाला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. मात्र आता आयपीएल सुरु असतानाच विराटने आपल्या नेतृत्वासंदर्भात भाष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 13, 2023, 01:25 PM IST
Virat Kohli : "मला सांगताना अजिबात लाज वाटत नाही की..."; IPL सुरु असतानाच विराटचं मोठं विधान title=
Virat Kohli About Mistakes

Virat Kohli Talks About His Mistakes: जगातील सर्वात आघाडीच्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीचा (Virat Kohli) सामवेश होतो. अनेक विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहेत. अगदी आयपीएल असो किंवा इतर 3 फॉरमधील क्रिकेट असो विराटचं नावच पुरेसं आहे असा त्याचा दबदबा आहे. विराटला नुकताच पुन्हा सूर गवसला असून तो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सर्वच खेळाडूंच्या करियरमध्ये चढ उतार येतो तसा विराटच्या आयुष्यातही आला. अगदी दीड वर्षांहून अधिक काय शतकाने दिलेली हुलकावणी, हातून गमावलेलं कर्णधारपद यासरख्या गोष्टीही विराटने पाहिल्या. सध्याच्या आयपीएलमध्येही विराटच्या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. याचदरम्यान विराटने त्याच्या कर्णधारपदासंदर्भातील एक खल नुकतीच बोलून दाखवली आहे.

विराटची कर्णधार म्हणून कारकिर्द

विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाला एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. खरं तर 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. कोहलीला कर्णधार म्हणून अनेक गोष्टी जमल्या पण ट्रॉफी मात्र जिंकला आलेली नाही. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेमध्ये त्यांच्याच घरात लोळवण्याचा विक्रम भारताने विराटच्या नेतृत्वा खालीच केला. टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये कोलहीच्या नेतृत्वाखाली भारताने फारच सुमार कामगिरी केली. विराटला यामुळे सर्वच प्रकारच्या क्रिकेटचं नेतृत्व सोडावं लागलं. त्याने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी संघाचं नेतृत्व सोडत आपल्या खांद्यांवरील भार हलका केला. मात्र कर्णधार असताना केलेल्या चुकांबद्दल विराटने आता आपलं मत मांडलं आहे. विराटने आपल्या हातून कर्णधार असताना काही गंभीर चूका झाल्याचं स्वीकारलं आहे.

मला अजिबात लाज वाटत नाही

"मी कर्णधार असताना अनेक चूका केल्या हे मान्य करण्यात मला अजिबात लाज वाटत नाही. मी चूका केल्या हे सांगताना मला अजिबात लाज वाटत नाही. 100 टक्के चूका झाल्या. मात्र मी यादरम्यान कधीच स्वत:चा विचार केला नाही," असं विराटने आपल्या नेतृत्वाबद्दल बोलताना म्हटलं आहे. पूमा स्पोर्ट्सच्या डॉक्युमेंट्रीमध्ये विराटने आपल्या नेतृत्वावर भाष्य केलं. "मी कधीच स्वार्थी विचार केला नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. मी कधीच स्वत:साठी काही केलं नाही. कायमच संघाला पुढे घेऊन जाण्याचा विचार केला. माझे निर्णय चुकले की बरोबर आले याबद्दलची जी काही जबाबदारी असेल ती माझी आहे हे मी स्वीकारतो. मी अपयशी ठरलो पण माझा हेतू कधीच वाईट नव्हता. जोपर्यंत तुम्ही योग्य ठिकाणी आहात तोपर्यंत तुम्ही चूका करत राहात. मात्र या चुकांमधून शिकून तुम्ही पुढे जाता आणि अधिक चमकदार कामगिरी करता," असं विराटने म्हटलं आहे.