'या ३ खेळाडूंनी क्रिकेट बदललं', इंझमामच्या यादीत एकही भारतीय नाही

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने क्रिकेट इतिहासातल्या अशा ३ खेळा़डूंची नावं सांगितली आहेत, ज्यांनी खेळ बदलला. 

Updated: Feb 19, 2020, 05:47 PM IST
'या ३ खेळाडूंनी क्रिकेट बदललं', इंझमामच्या यादीत एकही भारतीय नाही title=

लाहोर : पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने क्रिकेट इतिहासातल्या अशा ३ खेळा़डूंची नावं सांगितली आहेत, ज्यांनी खेळ बदलला. इंझमामच्या या यादीत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दिग्गज भारतीयांचं नाव नाही. व्हिव्हियन रिचर्ड्स, सनथ जयसूर्या आणि एबी डिव्हिलियर्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बदलून टाकलं, असं इंझमाम म्हणाला आहे.

'खूप वर्षांपूर्वी रिचर्ड्स यांनी क्रिकेट हा खेळ बदलून टाकला. त्यावेळी बॅट्समन फास्ट बॉलरना बॅकफूटवर खेळायचे, पण रिचर्ड्स यांनी फ्रंटफूटवर कसं खेळायचं आणि फास्ट बॉलरवरही आक्रमण करता येतं, हे रिचर्डस यांनी दाखवून दिलं,' असं वक्तव्य इंझमामने केलं आहे.

'क्रिकेटमध्ये दुसरा बदल सनथ जयसूर्यामुळे आला. इनिंगच्या पहिल्या १५ ओव्हरमध्ये आक्रमण करण्याची रणनिती जयसूर्याने अवलंबली. त्याआधी हवेत शॉट मारणाऱ्यांची गणना बॅट्समन म्हणून व्हायची नाही, पण जयसूर्याने पहिल्या १५ ओव्हरमध्ये ३० यार्डाच्या वरून शॉट खेळायला सुरुवात केली आणि क्रिकेटची परिभाषा बदलली,' असं मत इंझमामने मांडलं.

'एबी डिव्हिलियर्सनेही क्रिकेटमध्ये बदल घडवण्याचं काम केलं आहे. वनडे आणि टी-२० मध्ये सुरु असलेल्या जलद क्रिकेटसाठी एबी डिव्हिलियर्स जबाबदार आहे. आधीचे बॅट्समन सरळ बॅटने शॉट खेळायचे, पण एबीने पॅडल स्वीप आणि रिव्हर्स स्वीप मारायला सुरु केलं,' असं इंझमामने सांगितलं.