टॉस हरल्यानंतरही विराटची इच्छा पूर्ण

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे.

Updated: Aug 1, 2018, 05:24 PM IST
टॉस हरल्यानंतरही विराटची इच्छा पूर्ण title=

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या फास्ट बॉलरला मदत करतात हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. पण गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये गरमी आहे. मुंबई आणि चेन्नईसारखं वातावरण सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या भारतासारख्याच असतील असं बोललं जातंय.

या मॅचमध्ये टॉस जिंकलो असतो तर आपण बॉलिंगच घेतली असती असं विराट म्हणाला आहे. ही खेळपट्टी बॅट्समनना मदत करेल असं दिसतंय. पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण आहे. याचा फायदा घ्यायचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली. टेस्ट सीरिजसाठी केलेल्या तयारीमुळे आम्ही संतुष्ट आहोत. मागच्या वेळच्या खेळपट्ट्या वेगळ्या होत्या, असं वक्तव्य विराट कोहलीनं केलं.

या मॅचमध्ये भारतीय टीम इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या तीन फास्ट बॉलरना घेऊन उतरली आहे. ऑल राऊंडर म्हणून हार्दिक पांड्या तर स्पिनर म्हणून अश्विनला संधी देण्यात आली आहे.

भारतीय टीम

मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा

ही खेळपट्टी चांगली असली तरी त्यात थोडा ओलावा आहे. गरमीमुळे हा ओलावा लवकर निघून जाईल आणि खेळपट्टी बॅटिंगला अनुकूल होईल, असं इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणाला.

इंग्लंडची १ हजारावी टेस्ट

इंग्लंडची ही १ हजारावी टेस्ट मॅच आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या ९९९ टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं ३५७ मॅच जिंकल्या तर २९७ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आणि ३४५ मॅच ड्रॉ झाल्या. १८७७ साली इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली टेस्ट खेळली.

एजबेस्टनच्या मैदानात इंग्लंडनं आत्तापर्यंत ५० टेस्ट खेळल्या. यातल्या २७ मॅचमध्ये त्यांचा विजय आणि ८ मॅचमध्ये पराभव झाला. तर १५ मॅच ड्रॉ झाल्या. या मैदानात इंग्लंड पहिली टेस्ट मे १९०२ मध्ये खेळली होती.